वसमत(जि. हिंगोली): तालुक्यातील रेऊलगाव येथील बौद्ध समाजबांधवांनी लोकसहभागातून तब्बल दीड कोटी रुपये खर्चून आकर्षक असे बुद्ध विहार उभारले आहे. १९७८ पासून विहार उभारणीचे हाती घेतलेले काम २०१७ ला पूर्ण झाले आहे. बौद्ध गया येथील विहाराची प्रतिकृती असलेले विहार पाहण्यासाठी राज्यभरातील समाजबांधव रेऊलगाव येथे येत आहेत.
रेऊलगाव (ता. वसमत) येथील तत्कालीन तरुण मित्रमंडळांनी १९७८ साली बौद्ध विहार उभारणीची संकल्पना मांडली. ठिकठिकाणी विहार उभारणीसाठी नेते, पदाधिकारी, अधिकाऱ्यांची मदत घेतली जाते. विविध योजनेतून सभामंडप उभारण्यासाठी निधी मागीतला जातो. मात्र, येथील तरुणांनी आपण स्वत: विहार उभारण्याचा संकल्प केला. विहार उभारण्याचा निर्णय घेतला असला तरी नेमके विहार उभारायचे कसे? हा प्रश्न होता.
हेही वाचा - वाळू वाहतुकीवर बैठे पथकांची नजर
उपक्रमास चांगला प्रतिसाद
दरम्यान, रेऊलगाव येथील काही युवक १९८२ साली बौद्ध गया येथे गेले होते. तेथील विहार पाहून आपल्याही गावात असेच विहार उभारण्याचा संकल्प केला. त्यानंतर बौद्ध विहारासाठी लागणारा निधी नाटकाचे प्रयोग सादर करून जमा करण्यास सुरवात केली. यानंतर नाटक, ग्रंथ वाचनातून निधी जमा होत गेला. जमा होत गेलेला निधीनंतर बॅंकेत जमा करण्यास सुरवात केली. सुरवातीला काही युवकांनी हाती घेतलेल्या उपक्रमास नंतर चांगलाच प्रतिसाद मिळत गेला. त्यामुळे २००३ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ज्ञानपीठ नावाने संस्थेची नोंदणी केली.
एक एकर आठ गुंठ्ठे जमीन विकत घेतली
या वेळी जमा झालेल्या १५ लाख रुपयांतून एक एकर आठ गुंठ्ठे जमीन विकत घेतली. या जमिनीवर विहार उभारण्यास सुरवात झाली. दरम्यान, स्थापन केलेल्या संस्थेचे २१५ सदस्य झाले. सर्व सदस्य दर पाडव्याच्या दिवशी एकत्र येत. या वेळी प्रत्येकी सदस्य चार हजार ५०० रुपये जमा करत. जमा होणाऱ्या निधीतून २००८ साली ज्ञानपीठ इमारतीची उभारणी करण्यात आली. त्यानंतर २०११ साली विहाराचे शिखर; तर २०१६-१७ साली दुसऱ्या दोन शिखराचे बांधकाम व नक्षीकाम पूर्ण झाले. यासाठी तब्बल एक कोटी ४० लाख रुपये लागले आहेत.
येथे क्लिक करा - फिरत्या चहा दुकानाने साधली ‘प्रगती’
बौद्ध गया येथील बुद्ध विहाराची प्रतिकृती
आता बौद्ध गया येथील बुद्ध विहाराची प्रतिकृती तयार झाली असून राज्यभरातून बौद्ध समाजबांधव विहार पाहण्यासाठी येत आहेत. विशेष म्हणजे विहार उभारणीसाठी कोणत्याही राजकीय पुढाऱ्याची मदत घेतली नाही. तसेच शासनाचा कोणताही फंड मागितला नाही. दरम्यान, तत्कालीन युवकांचे आता वय झाले असून बहुतांश जणांचे वय ६० ते ६५ वर्षे झाले आहे. यामध्ये एकनाथ सूर्यवंशी, किशन सूर्यवंशी, सोपान सूर्यवंशी, नागोराव सूर्यवंशी, अशोक सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी, भीमराव खिल्लारे, वसंत खिल्लारे आदींसह बौद्ध समाजबांधवांचा समावेश आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.