राजकीय गणितांवर यंदा मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली शकले यांचा परिणाम दिसेल. आगामी लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर वगळता मराठवाड्यातील सात मतदारसंघात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी थेट लढतीची चिन्हे आहेत.
मराठवाड्यातील आठपैकी भाजपकडे जालना, लातूर, बीड, नांदेड या चार जागा आहेत, तर धाराशीव, परभणी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), हिंगोली शिवसेनेकडे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमआयएम’चा खासदार आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला मिळण्याची चिन्हे आहेत. यावेळी मतविभाजन होणार नाही, याची काळजी भाजप घेत आहे. जालना हा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मतदारसंघ आहे. त्यांना तुल्यबळ लढत देण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न राहील. ही जागा काँग्रेस लढणार की ठाकरे गट हे अद्यापही निश्चित नाही.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे बीड हा कायमच भाजपसाठी महत्त्वाचा मतदारसंघ मानला गेला. नंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय ताकद वाढली. पण अजित पवार हेच भाजपबरोबर गेल्याने धनंजय मुंडे हे देखील भाजपबरोबर असतील. त्यांना विधानसभेसाठी एक जागा सोडून लोकसभा भाजप लढविणार हे निश्चित आहे. मात्र, इथे डॉ. प्रीतम मुंडे की पंकजा मुंडे यांपैकी लोकसभा कोण लढविणार असा प्रश्न आहे.
त्यात पंकजा मुंडे यांचे नावही पुढे येत आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप वेगळी भूमिका घेऊ शकेल. परभणी मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आग्रही आहे. महायुतीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू समर्थक राजेश विटेकर हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय जाधव आणि राजेश विटेकर यांच्यातील सामना बघायला मिळेल.
लातूर जिल्हा कॉग्रेसचा बालेकिल्ला. परंतु गेल्या काही निवडणुकांच्या माध्यमातून भाजपमय झाला आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात पुन्हा एकदा विजयश्रीची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी या पक्षात लगीनघाई सुरू आहे. भाजपचे सुधाकर शृंगारे हे विद्यमान खासदार आहेत. विश्वजित गायकवाड हेही वडिलांची पुण्याई अजमावू पाहात आहेत. त्यांचे वडील अनिल गायकवाड हे सध्या ‘एमएमआरडी’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
निवडून येण्याची क्षमता हेच उमेदवारी मिळण्यासाठी परिमाण मानले जाईल. धाराशीवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे गटात आहेत. भाजपनेही या जागेवर दावा केला असून, त्यांच्याकडून राणा जगजितसिंह पाटील, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी मंत्री बसवराज पाटील यांची नावे चर्चेत आहे. एकनाथ शिंदे गटाकडून स्वतः आरोग्यमंत्री तानाजी सावंत, त्यांचे पुतणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धनंजय सावंत यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे ही निवडणूक लक्षणीय असेल.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात काँग्रेससाठी सहज वाटणारी वाट बिकट झाली आहे. भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी असली, तरी अशोक चव्हाण हे कुणाचे नाव सुचवितात, यावर लढत ठरेल. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट ) या जागेसाठी दावेदार असेल. हिंगोली मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र, यावेळी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने जिल्ह्याच्याही राजकारणावर परिणाम झाला.
खासदार हेमंत पाटील तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीचा कडवा सामना त्यांना करावा लागणार आहे. परभणी मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आग्रही आहे. त्यांच्या वाट्याला जागा आल्यास त्यांचा सामना शिवसेनेशी (ठाकरे गट) असेल. सध्या तिथे या गटाचेच खासदार आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या मतांमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाऊ शकतो.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.