सोयाबीन, हळद, तुरीचा पेरा वाढणार, कुठे ते वाचा...

farmer-120011
farmer-120011

हिंगोली : जिल्ह्यात या वर्षी खरीप हंगामासाठी तीन लाख ७८ हजार ९९२ हेक्टर प्रस्तावित असून या वर्षी सोयाबीन, तुरीचा पेरा वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. तसेच कापूस लागवडीच्या क्षेत्रात घट होणार असून शेतकऱ्यांची हळद पिकाला पसंती असल्याचे खरीपपूर्व आढावा बैठकीतून स्पष्ट झाले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत नुकतीच झाली. यामध्ये खासदार राजीव सातव, खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, चंद्रकांत नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद पोहरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, उपनिबंधक सुधीर मैत्रेवार, कृषी विकास अधिकारी एन. आर. कानवडे यांनी यामध्ये सहभाग नोंदविला. या वेळी जिल्ह्यातील खरीप हंगामाबाबत आढावा घेण्यात आला. 

कृषी विभागामार्फत खरीप पेरणीचे नियोजन  
या वेळी जिल्ह्यातील एकूण लागवडीयोग्य क्षेत्रापैकी तीन लाख ७८ हजार ९९२ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. खरीप पिकांमध्ये प्रामुख्याने सोयाबीन दोन लाख ५५ हजार ४०० हेक्टर, तूर ५२ हजार ५०० हेक्टर, कापूस ४५ हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले. त्याशिवाय तृणधान्य सात हजार ९५४ हेक्टर, कडधान्य ७० हजार ३३३ हेक्टर व गळीत धान्य दोन लाख ५५ हजार ६५५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणे अपेक्षित आहे. तसेच खरीप हंगामात सोयाबीन पाच हजार ९३ हेक्टर, कडधान्य पिकामध्ये तूर दोन हजार सहा हेक्टर एवढ्या क्षेत्रावर पेरणीची वाढ होणे अपेक्षित आहे. तर कापूस पिकाच्या क्षेत्रामध्ये गतवर्षीच्या तुलनेत दोन हजार ११ हेक्टर एवढ्या क्षेत्राची घट होण्याची शक्यता वर्तविली आहे. हळद पीक शेतकऱ्यांचे मुख्य नगदी पीक म्हणून समोर येत असून गतवर्षीच्या तुलनेमध्ये दोन हजार १५१ हेक्टर एवढ्या वाढीव क्षेत्रासह एकूण ३८ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड होणे अपेक्षित असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

एक लाख ६६ हजार क्विंटल बियाणे
सोयाबीनच्या प्रस्तावित क्षेत्राकरिता एकण एक लाख ६६ हजार क्विंटल बियाणाची आवश्यकता असून सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, खासगी कंपन्या तसेच शेतकऱ्यांकडून हे बियाणे उपलब्ध होणार आहे. कापसाच्या प्रस्तावित क्षेत्राकरिता विविध कंपन्यांचे दोन लाख २५ हजार बीटी कापूस बियाणाची पाकीटे उपलब्ध आहेत. तसेच तूर, ज्वारी, मूग, उडीद, मका आदी पिकांचे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. तसेच खरीप हंगामासाठी ६५ हजार २३० मेट्रिक टन एवढे रासायनिक खताचे आवंटन मंजूर झाले असून मंजुर आवंटनाप्रमाणे खताचा पुरवठा केला जात आहे. तसेच कृषी निविष्ठांची गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्हा स्तरावर कृषी विकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सहा भरारी पथक व तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहेत.

बियाणांच्या पुरवठ्यासाठी नियोजन करावे : पालकमंत्री गायकवाड
हिंगोली: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कृषी विभागाने उच्च प्रतीच्या उगवण क्षमता असलेल्या बियाणांचा पुरवठा करण्याचे सूचना शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. पालकमंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या, खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून बियाणांच्या उगवण क्षमतेबाबत तक्रारी प्राप्त होऊ नये, याची कृषी विभागाने दक्षाता घ्यावी. वीज जोडणीकरिता प्राप्त अर्जांवर तत्काळ कार्यवाही करून जोडणी द्यावी. तसेच बोगस बियाणे, रासायनिक खत, कीटकनाशकांची विक्री व वितरण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, बियाणे व खत योग्य प्रमाणात व योग्य वेळेत उपलब्ध होतील याचे नियोजन करावे, अशा सूचना या वेळी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच शेततळे, सिंचन विहीर, प्रधानमंत्री पीकविमा योजना, कृषिपंपांना वीज जोडणी, मृद आरोग्यपत्रिका, कृषी विस्तार कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, रेशीम लागवड, पीकविमा, फलोत्पादन कार्यक्रम, आपत्कालीन पीक नियोजन आदी बाबींचा आढावा घेतला. या वेळी खासदार राजीव सातव, खासदार हेमंत पाटील यांनीही सूचना दिल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com