Success Story : दहा एकराला ४० गुंठे भारी! अवघ्या दीड महिन्यात शिमला मिरचीतून दोन लाखांचं उत्पन्न

Success Story capsicum farmers
Success Story capsicum farmers

पाचोड: जिद्द, मेहनत, पराकाष्ठा व चिकाटी या चतुःसूत्रीचा अवलंब केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश हमखास मिळते याची प्रचिती हर्षी बु (ता.पैठण) येथील सुशिक्षित तरुण शेतकरी दांपत्याने तोट्याची समजली जाणारी शिमला मिरची चाळीस गुंठे शेडनेटमध्ये फुलवून दाखवून दिले. एवढेच नव्हे तर ''दहा एकराला एक एकर शिमला मिरचीची शेती भारी'' म्हणत खरीप-रब्बीने दगा दिल्यानंतर शिमला मिरचीची लागवड त्यांच्यासाठी वरदान ठरली.

हर्षी (ता.पैठण) येथील कृष्णा आगळे व त्यांची पत्नी जयश्री आगळे या जोडप्याने पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर एक एकर (चाळीस गुंठे) क्षेत्रावर कृषी विभागाकडून शेडनेट हाऊस उभारले. या शेडनेटमध्ये वरंबे तयार करून त्यावर ठिबक सिंचन व मल्चिंग पेपर बसविले. १९ जानेवारी २०२३ रोजी शिमला मिरचीची आठ हजार रोपे आणून त्यावर लागवड केली.

शेणखत रासायनिक खते, औषधी आदीचे वेळापत्रकानुसार नियोजन करून कोणत्याही मजुराची वाट न पाहता पती पत्नीने स्वतः सह मदतीस वडील लक्ष्मण आगळे, आई मंगलबाई आगळे व भाऊ नारायण आगळे यांना सोबत घेऊन दररोज सर्व शेतीचे नियमित पाणी, फवारणी, निंदणी करून मिरचीची काळजी घेतली.

आता एप्रिलपासून मिरचीचे उत्पादन निघण्यास सुरुवात झाली. प्रत्येक आठवड्याला अडीच ते तीन टन मिरचीचे उत्पन्न होत आहे. सुरवातीला काही दिवस साठ रुपये किलोप्रमाणे मिरचीला दर मिळाला व त्यानंतर दर निम्यावर आले. आता तीस रुपये किलोप्रमाणे मिरचीला भाव मिळत आहे.

प्रत्येक आठवड्याला सत्तर ते ऐशी हजार रुपये हातात येत असल्याने कुटुंबीयांच्या परिश्रमाला फळे मिळाले आहे. तोडणी केलेली मिरची सुरत, पुणे, परभणी, नांदेड, हिंगोली येथील बाजारपेठेत विक्री करीत असून आगामी काळात मिरचीच्या उत्पादनात वाढ होईल. दर्जेदार मिरची पाहून स्थानिक व्यापाऱ्यासह परजिल्ह्यातील व्यापारी बांधावर येऊन मिरची खरेदी करीत आहे.

यंदा अतिवृष्टीमुळे सर्व खरीप-रब्बीची वाट लागली मात्र, शिमला मिरचीच्या उत्पन्नामुळे दीड महिन्यातच अडीच तीन लाखाचे उत्पन्न पदरात पडले. यात मिरचीवर एक लाख रुपये खर्च झाला. उत्पन्नातून खर्च वजा महिन्याकाठी दोन लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे.

उपविभागीय कृषीधिकाऱ्यांची भेट

वयोवृद्ध आजोबांपासून सर्वजण मिरची तोडणी व छाटणी, वजन करणे, पॅकिंग करणेसाठी राबत असल्याने मजुरीवर शून्य टक्के खर्च आला. एवढेच नव्हे तर ठिबकद्वारे पाणी, खते, औषधी सोडल्याने मनुष्यबळाची बचत झाली. कृष्णा व जयश्रीचे प्रयत्न व उत्पन्न पाहून औरंगाबादच्या उपविभागीय कृषिअधिकारी धनश्री जाधव यांनी स्वतः भेट देऊन त्यांचे कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com