शिक्षणाच्या दारातच तळीरामांचा अड्डा !

फोटो
फोटो

मुक्रमाबाद (ता. मुखेड, नांदेड) : शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना दारूच्या बाटल्या उचलण्याची वेळ आली असून रोजच शिक्षणाच्या दारी तळीरामाच्या पार्ट्या जोरात सुरू आहेत. फुटलेल्या बाटल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पायाला व हाताला जखमा झाल्या असून शाळेच्या आवारात पसरलेल्या दारूच्या व पाण्याच्या बाटल्या गोळा करण्यातच शिक्षकांचा महत्त्वाचा वेळ वाया जात आहे. शहरातील उन्नाड तळीरामांचा पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारूच्या पार्ट्या जोरात सुरू असून या तळीरामामुळे शिक्षकासह पालकही हतबल झाले आहेत. 

यावर शिक्षण विभागही कारवाई करत नाही अन् स्थानिक नेत्यांना व ग्राम पंचायतीला याचे काहीच सोईर सुतक उरलेले नाही. रोज शाळेच्या मुख्य दारातच दारूच्या बाटल्याचे व फुटलेल्या काचाचे दर्शन होत असून शाळेच्या वर्ग खोल्यात दारूचा उग्र वास घोंघावतोय. या मुळे आम्ही इथे शिक्षण घेतो हाच आमचा गुन्हा काय ? असे विद्यार्थी बोलत आहेत. 

मुखेड तालुक्यातील नामवंत शाळा 

मुखेड तालुक्यातील नामवंत शाळा म्हणून येथील जिल्हा परिषद शाळेकडे मोठ्या अभिमानाने पाहीले जायाचे. याच शाळेने अनेक हुशार विद्यार्थी घडविले आहेत. पण सध्या शाळेकडे कोणाचेच लक्ष नसल्यामुळे ही शाळा शेवटची घटीका मोजत आहे. शाळेत विद्यार्थ्यांची संख्याही पहीलेच अपुरी आहे. तज्ञ शिक्षकही नाहीत. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोल्या सुरक्षित नाहीत. तरीही येथील पालक आपल्या पाल्यांना शिक्षण घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत पाठवून देत आहेत. पोलिस ठाणे अगदी हाकेच्या अंतरावर असतानाही शहरातील व परिसरातील दारूड्यांनी उच्चाद मांडला असून रोज शाळेच्या मुख्य दरवाज्याशेजारी व शाळेच्या आवारात अंधाराचा फायदा घेत ठिकठिकाणी दारूच्या पार्ट्या करून दारूच्या बाटल्या मैदानावर फोडून टाकत असल्याने त्या काचामुळे विद्यार्थ्यांच्या पायाला व हाताला मोठी इजा होत आहे. 

शेजारीच पोलिस ठाणे

विद्यार्थी हा शाळेत प्रवेश करताच प्रार्थना होण्यापुर्वी सर्वच विद्यार्थ्यांना एक तास शाळेच्या आवारात पडलेल्या दारूच्या बाटल्या व ठिकठिकाणी पडलेली काचे वेचून काढावी लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाता- पायाला इजा होत आहे. तर आम्ही आमच्या मुलांना शाळेत शिक्षणासाठी पाठवतो का? दारूच्या बाटल्या उचलण्यासाठी? असा प्रश्न आता पालक विचारत आहेत. तर शेजारीच पोलिस ठाणे असतानाही हे, तळीराम त्यांच्या नाकावर टिच्चून संध्याकाळ होताच शाळेच्या आवारात दारूच्या पार्ट्या रंगत असतानाही यावर पोलिस प्रशासनाची वचक राहीली नाही हेच सिद्ध होते. 


दारूड्यांवर कडक कारवाईची मागणी

संध्याकाळ होताच शहरातील काही उन्नाड टोळके हे शाळेच्या आवारातच बसून दारूच्या पार्ट्या रंगवत असल्यामुळे शाळेला एखाद्या दारू अड्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. अशा तळीरामावर शिक्षण विभागाकडून व पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई केली तरच या पार्ट्या बंद होतील अन्यथा याचा त्रास विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कायम होणार आहे. या किळसवाण्या प्रकराची गंभीर दखल घेणे गरजेचे होऊन बसले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com