बीडमध्ये लसीकरणाचा टक्का वाढतोय

नऊ लाखांवर लोकांना लसीचा पहिला डोस
Vaccination
Vaccinationsakal

बीड : कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा जबर तडाखा बसलेल्या जिल्ह्यातून कोरोना आता पायउतार होत असल्याचे चित्र आहे. त्यातच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचाही टक्का वाढत आहे. आतापर्यंत तब्बल नऊ लाखांहून अधिक (९०७७१४) लोकांना लसीचा पहिला डोस टोचला आहे. तर, तीन लाख ६० हजार लोकांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत.

Vaccination
औरंगाबाद: वीस एमएलडी पाण्यासाठी लागणार नऊ कोटींचा निधी

कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा जिल्ह्याला जबर तडाखा बसला. मार्च महिन्यात सुरु झालेली दुसरी लाट जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात शिखरावर होती. अगदी एकाच दिवशी दीड हजारांवर रुग्णसंख्या आणि ३५ टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्हिटी रेट असे चित्र होते. त्यानंतर जून महिन्यापासून सर्वत्र दुसरी लाट ओसरली. मात्र, जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रुग्णसंख्या तीन अंकीच होती.

अलीकडे हा आकडा बऱ्यापैकी कमी झाला आहे. अगदी मागच्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या दोनअंकी आणि पन्नाशीच्या आतमध्ये आली आहे. दरम्यान, बुधवारी (ता. २२) २२५० स्वॅब तपासण्यांमध्ये गुरुवारी (ता. २३) हाती आलेल्या अहवालांमध्ये ३२ नवे रुग्ण आढळले. तर, २२१८ अहवाल निगेटिव्ह आले. तपासण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण १.४२ टक्क्यांवर खाली आले आहे.

दरम्यान, जिल्ह्याची रुग्णसंख्या एक लाख २४९३ झाली असून आतापर्यंत ९९ हजार २६९ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ५७० रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, गुरुवारी आणखी दोन नवीन कोरोनाबळींची नोंद झाली असून आतापर्यंत जिल्ह्यात २७५४ कोरोनाबळी गेले आहेत.

लसीकरणास लोकांचा प्रतिसाद

कोरोना विषाणू संसर्गाची पहिली लाट ओसरल्यानंतर जानेवारी महिन्यात प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला लसीकरणाबद्दल भिती व संभ्रम यामुळे लोकांचा प्रतिसाद नव्हता. नंतर लसींचा तुटवडा असे चित्र होते. मात्र, आता आठ महिन्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला काहीसा वेग आल्याचे चित्र आहे. आतापर्यंत तब्बल १२ लाख ६८ हजार ४६८ लसींचे डोस टोचले आहेत.

यामध्ये तीन लाख ६० हजार ७५४ लोकांचे लसींचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. तर, नऊ लाख ७७१४ लोकांना लसीचा एक डोस टोचण्यात आला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लसीकरण हा महत्त्वाचा भाग मानला जातो. लसीचा किमान एक डोस टोचला असला तरी कोरोना विषाणू संसर्ग झाला तरी त्याचा प्रभाव फारसा राहत नाही, असा तज्ज्ञांचा दावा आहे. एकट्या गुरुवारी लसीचे ८५७६ डोस टोचण्यात आले. जिल्ह्यात ७३ केंद्रांमध्ये लसींसाठी शीतसाखळींची सोय आहे. उपलब्धतेनुसार लसीकरण केले जाते.

"सध्या दहा हजार डोस शिल्लक असून आणखी ७५ डोसची मागणी केलेली आहे. उपलब्धतेनुसार लसीकरणाची आरोग्य विभागाची क्षमता आहे."- डॉ. रऊफ शेख, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com