तुरीला एकरी तीन क्विंटलचा उतारा

photo
photo

सेनगाव(जि. हिंगोली): मागील पाच वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पीक उत्पादनाला बसत आहे. प्रमुख खरीप हंगामातील सोयाबीन गेले तरी तुरीच्या उत्पादनातून काही प्रमाणात कसर भरून निघत असे. मात्र, या वर्षी अतिवृष्टीमुळे अपेक्षित उत्पादनात घट होण्याची शक्यता असून हलक्या जमिनीत दोन ते तीन क्विंटल तुरीचा उतार येऊ लागला आहे.

सेनगाव तालुक्‍यात बहुतांशी शेतकऱ्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतीला पूरक जोड व्यवसायाअभावी शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होत नाही. प्रामुख्याने खरीप हंगामावरच कोरडवाहू शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून राहते. शेतपीकली नाही तर पुढील हंगामाची प्रतीक्षा करावी लागते. मागील पाच वर्षांत सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा, कमी पर्जन्यमान, अतिवृष्टी व विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेती व्यवसाय चांगलाच अडचणीत आल्याचे चित्र आहे.

दोन हजार हेक्टर क्षेत्रावर तुरीचे पीक

तालुक्‍यात एकूण क्षेत्र एक लाख ११ हजार ८३८ हेक्टर आहे. त्यापैकी जवळपास ९२ हजार ९६५ हेक्टर जमिनीचा शेतीसाठी उपयोग होतो. खरीप हंगामासाठी साधारणतः ६५ हजार हेक्टर जमिनीचा वापर केला जातो. तुरीचे पीक दोन हजार हेक्टर क्षेत्रात असते. मागील वर्षी दुष्काळी स्थितीमुळे खरीप हंगामातील पीक उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यामुळे या वर्षी तरी समाधानकारक उत्पादन निघेल, ही अपेक्षा होती. परंतु, अतिवृष्टीमुळे काढणीवर आलेले सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हातचे गेले.

एकरी दोन ते तीन क्विंटलचा उतार

 त्यासोबत तुरीच्या पिकाचे नुकसान झाले. अतिवृष्टी झाली नसती तर हे वर्ष बळिराजासाठी संजीवनी ठरणारे होते. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे हे होऊ शकले नाही. अतिवृष्टी पाठोपाठ तूर पिकाला धुळीने गारद केले. सध्या या भागातील शेतकरी तूर कापणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. हलक्‍या प्रतीच्या जमिनीवरील तूर काढणी होत असून एकरी दोन ते तीन क्विंटलचा उतार येत आहे. चांगल्या प्रतिच्या जमिनीवरील तुरीचा उत्तार यापेक्षा थोडा जास्त आहे.

हमीभावापेक्षा कमी भाव

सध्या तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून बाजार समितीत माल विक्रीसाठी आणला जात आहे. तुरीला हमी भाव पाच हजार ८०० एवढा आहे. मात्र, व्यापाऱ्यांकडून तुरीत ओलावा असल्याचे कारण पुढे करीत चार हजार ८०० ते पाच हजार रुपयांप्रमाणे तुरीची खरेदी केली जात आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा एक हजार रुपये प्रतिक्विंटल कमी दर मिळत आहे.

अतिवृष्टी व धुळीमुळे उत्पादनात घट

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतमाल उत्पादनात घट होऊ लागली आहे. माझ्याकडे वीस एकर शेती असून सोयाबीनची कसर तूर पीक उत्पादनातून निघत होती. दरवर्षी एकरी पाच क्विंटल तूर उत्पादन होणारी या वर्षी एकरी अडीच क्विंटलचा उतारा आला आहे. अतिवृष्टी व धुळीमुळे उत्पादनात घट झाली आहे.
-गजानन पाटील, वलाना, शेतकरी

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com