जीवघेणा प्रवास अन् कसरतीचा थरार

Relway
Relway

नांदेड : रेल्वेचा प्रवास सुखकर प्रवास असे सांगण्यात येते. मात्र, परभणी ते नांदेड रेल्वे प्रवास जीवघेणा ठरत आहे. हा प्रवास एक-दोन दिवसांचा नाही तर दररोजचा झाला आहे. या जीवघेण्या कसरतीला प्रवासी कंटाळले आहेत. मात्र, रेल्वे प्रशासन याची दखल घेताना दिसत नाहीये. परभणी-नांदेड प्रवास हा केवळ ५८ किलोमीटरचा असताना यासाठी दोनदा रेल्वे बदलावी लागते आणि तब्बल तीन तासांचा मनस्ताप सहन करावा लागतो.    

परभणी ते नांदेडचा प्रवास अनेक जण रेल्वेने करण्यास प्राधान्य देतात, त्याची कारणे अनेक आहेत. पण आता त्याच रेल्वेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना ५८ किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी दोन पॅसेंजर बदलून नांदेड येथे दुपारी साडेतीन वाजता पोचावे लागल्याचा अनुभव शनिवारी दुपारी साडेबारा वाजता नगरसोल - नांदेड पॅसेंजरला परभणी येथून बसल्यावर आला. विशेष म्हणजे ही रेल्वे परभणी येथून एक वाजता निघाली आणि दीड वाजता मिरखेल पोचल्यावर तिच्यातून उतरून मिरखेल ते नांदेड हा प्रवास काचीगुडा रेल्वेने करावा लागला. यात आबालवृध्द, महिला आणि इतर प्रवाशांना विरुध्द दिशेने असलेल्या पटरीवर प्लॅटफॉर्म नसताना कसरत करत उतरावे लागले.   

रेल्वे आणि बसच्या तिकीट दरात सहा पट फरक

परभणी ते नांदेड हे अंतर रस्त्याने ८० ते ८५ किलोमीटर एवढे आहे. बसचा पर्याय चांगला असला तरी शंभर रूपये तिकीट आणि खड्डेमय प्रवास ह्यापेक्षा अनेक जण रेल्वेला प्राधान्य देतात. त्यात  सध्या परभणी ते वसमत ह्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने हा प्रवास जिकरीचा बनला आहे. शिवाय रेल्वे आणि बसच्या तिकीट दरात सहा पट फरक आहे. 

असे आहेत बस, रेल्वेचे तिकीट दर

पंधरा रूपयात पॅसेंजर, मेल एक्सप्रेस पस्तीस तर सुपरफास्ट पन्नास रूपये तर बसचे भाडे परभणी ते तरोडा ८९ आणि नांदेड बसस्थानक अथवा शहरापर्यंत १०५ एवढे आहे. अशावेळी प्रवासी भाडे आणि बसच्या खड्डेमय प्रवासापेक्षा रेल्वेने जाणारे प्रवासी अधिक सापडतील.


प्रवाशांनी मांडल्या व्यथा

दररोज परभणी येथून पूर्णा, नांदेड जाण्यासाठी परभणी येथून दुपारी साडेबारा वाजता निघणारी नगरसोल-नांदेड आणि त्यानंतर येणारी मनमाड-काचिगूडा या दोन रेल्वेने नांडला जाण्यासाठी किमान अडीच ते तीन तास लागत असल्याचा अनूभव काही प्रवाशांनी ‘सकाळ’कडे बोलून दाखविला. दररोज असाच प्रकार घडतो, मात्र, ऐरव्ही पूर्णा येथून मनमाड-काचिगूडा रेल्वे पुढे नांदेडला सोडली जाते. शनिवारी मिरखेल येथे जर अर्धा तास नांदेड पॅसेंजर थांबवायची होती तर मग परभणीहून तिला का सोडले आणि पूर्णा येथे या दरम्यान प्लॅटफॉर्म रिकामा होता तर मग मिरखेल येथे का थांबवून घेतले, असे प्रश्‍न अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांनी बोलून दाखविले. दररोज जीवाला धोका करून असा कसरतीचा प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आणण्याचे कारण तरी काय, याचे उत्तर रेल्वे प्रशासनाने द्यावे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com