जालना- जालन्यात धनगर समाजाच्या आंलोदलनाला हिंसक वळण लागले आहे. जमलेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दगडफेक करत खिडकीच्या काचा फोडल्या आहेत. याठिकाणी उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी शेकडोंच्या संख्येने आंदोलक जमले होते. यावेळी ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं.
धनगर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसले आणि त्यांनी तोडफोडीला सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालय, बाहेर ठेवलेल्या कुंड्या, खुर्च्या यांची नासधूस करण्यात आली. कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. यावेळी पोलिसांची संख्या कमी असल्याने त्यांना शेकडोंच्या संख्येने असलेल्या आंदोलकांना रोखता आले नाही.
काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरुन जालन्या जिल्ह्यात मोठी नासधूस घडून आली होती. आता पुन्हा जालना जिल्ह्यातच आंदोलक हिंसक झाल्याने पोलिस यंत्रणेवर प्रश्व उपस्थित होत आहेत. पोलिसांना आंदोलक आक्रमक होतील असं वाटलं नव्हतं का? तसेच आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत असताना कोणतीही तयारी करण्यात आली नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करून आरक्षण जाहीर करावे या मागणीसाठी मंगळवारी (ता. 21) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यानंतर मागणीचे निवेदन देण्यासाठी निघालेल्या शिष्टमंडळासोबत आंदोलनात सहभागी झालेले आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या खाजगी वाहनासह इतर वाहनांची तोडफोड केली. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली
धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावे, ही अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र, याची अंमलबजावणी न झाल्याने धनगर समाज आक्रमक झाला असून मंगळवारी (ता. 21) जालना शहरातील गांधीचे चमन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. आंदोलन शेवटच्या टप्प्यापर्यंत शांततेत सुरू होते. मात्र, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळासोबत आंदोलनात सहभागी झालेले इतर आंदोलक ही जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात घुसले.
या जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयात पार्क केलेल्या दुचाक्या, फुलांचे झाड आणि जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या खाजगी वाहनासह अन्य एका चार चाकी वाहनाची तोडफोड केली. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी मध्यस्ती करून जमावाला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसलेला सर्व जमाव बाहेर काढला. मात्र, या घटनेमुळे या आंदोलनाला उग्र स्वरूप प्राप्त झाले. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.