जिंतूर : येलदरी धरणातून उन्हाळी हंगामातील पिकांसाठी बुधवारी (ता.०३)दुसरे आवर्तन नदीपात्रात सोडण्यात आले. परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील पिकांना या पाण्याचा मोठा दिलासा मिळणार आहे तसेच मुक्या प्राण्यांना देखील पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार असून शेकडो गावांची तहान देखील भागणार आहे.
परंतु यामुळे धरणाची पाणी पातळी बरीच खालावणार आहे.सध्या धरणात ३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून आता दुसरे आवर्तन सोडल्यानंतर धरणातील गाळाचे प्रमाण आणि धरणातील उपयुक्त पाण्याचे प्रमाण याचा ताळमेळ जलसंपदा विभागाला लावावा लागणार आहे.
अन्यथा धरणात केवळ गाळच शिल्लक राहिल्यास येणाऱ्या काळात मोठ्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.शिवाय उर्वरित गाळयुक्त पाण्यामुळे धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती राहणार. त्यामुळे जलसंपदा विभागाने पाणी सोडताना या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे.
परभणी जिल्ह्यातील येलदरी येथील धरण हे मराठवाड्यातील पहिले धरण असून यावर अर्ध्या मराठवाड्याची तहान भागवणारे धरण म्हणून पाहिले जाते.यावर्षी धरणात आजरोजी (ता.०३) केवळ ३९ टक्केच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून तो गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्के कमी असल्यामुळे व मार्च महिन्यापासूनच तापमानात प्रचंड वाढ होत असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होते आहे.
त्यामुळे उन्हाळ्यातील उर्वरित तीन महिने अवघड जाण्याची शक्यता आहे. यासाठी जलसंपदा विभागाला पाण्याचे नियोजन करतांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
मागील चार वर्षांपासून सतत शंभर टक्के भरत आलेले हे धरण वर्षी संपलेल्या अत्यल्प पावसामुळे केवळ ६२ टक्केच भरले होते.त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील धरणातील अत्यल्प पाणीसाठा पाहता कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.