पाणीटंचाईच्या झळा : अठ्ठावीस विहिरींचे अधिग्रहण...कुठे वाचा

hingoli photo
hingoli photo

हिंगोली : जिल्ह्यात यंदा संभाव्य पाणीटंचाई पाहता दोन गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात असून २६ गावांत २८ विहिरींचे अधिग्रहण केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.

जिल्ह्यात मागील वर्षी सरासरी ९५ टक्के मिलिमीटर पर्जन्यमान झाले. परतीच्या पावसाने येलदरी धरण शंभर टक्के भरल्याने या धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. हे पाणी जिल्ह्यातील सिद्धेश्ववर धरणात साठले असून धरण तब्बल बारा वर्षांनी शंभर टक्के भरले होते. 

इसापूर धरणात मुबलक पाणीसाठा 

तर इसापूर धरणातही मुबलक पाणीसाठा झाला होता. सप्टेंबर महिनाअखेर विदर्भातील खडकपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस पडल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे इसापूर धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. या धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा उपलब्ध झाल्याने हिंगोली, वसमत, औंढा शहराचा पाण्याचा प्रश्न काही अंशी तरी मिटला आहे. 

चार दिवसांआड पाणीपुरवठा

मात्र, ग्रामीण भागातील अनेक गावांतील पाणीपातळी खालावल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हिंगोली शहरात सध्या चार दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. कळमनुरी तालुक्यातील खापरखेडा (पानबुडी वस्ती), माळधावडा या दोन गावांत कायमस्वरूपी नळ योजना नसल्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके बसतात. 

टँकरने पाणीपुरवठा सुरू

पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार तहसील कार्यालयाने तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तातडीने प्रस्ताव मंजूर करून टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. 

तसेच पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांतील खासगी विहिरी, बोअर अधिग्रहण करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले होते. त्यानुसार सेनगाव तालुक्यात ११ गावांत १४ विहिरी, औंढा तालुक्यातील दोन गावांत दोन, कळमनुरी तालुक्यात तीन गावांत चार, तर हिंगोली तालुक्यातील दहा गावांत आठ, अशा चार तालुक्यांतील २६ गावांत २८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. प्रस्ताव दाखल झाल्यानंतर दाखल केलेले प्रस्तावांना मंजुरी मिळताच टंचाईग्रस्त गावांना सरकारी टँकरने पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले.

जून महिन्यापर्यंत टँकरने पाणीपुरवठा

मागील वर्षीदेखील खापरखेडा, माळधावडा या दोन गावांत पाणीटंचाई निर्माण झाली होती. यंदादेखील या भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने गावातील सार्वजनिक विहिरी, विंधन विहिरी डिसेंबर महिन्यातच कोरड्याठाक पडल्या आहेत. गावात जानेवारी महिन्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. या गावाना कायमस्वरूपी नळ योजना नसल्याने जून महिन्यापर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com