जिंतूर - बुधवारी (ता. २७) सर्वत्र श्रीगणेशाच्या स्वागताची तयारी सुरू असताना यादिवशी सकाळी नऊच्या सुमारास तालुक्यातील पाचलेगाव येथे विजेच्या खांबावरील वीज प्रवाहित तार तुटून पडल्याने विजेच्या जबर धक्क्याने महिला गंभीर जखमी झाली. ज्योती गोपाळ रणखांब (वय-३२) असे जखमी महिलेचे नाव आहे.
ज्योती ह्या सकाळच्या वेळी रस्यावरून जात असताना विजेच्या खांबावर लोंबकळत असलेली विद्युत तार अचानक तुटून खाली पडली. तेव्हा जवळच असलेल्या ज्योती यांना विजेचा जबर धक्का बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी गजानन ढवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.