कारभारणींच्या शेतीतल्या योगदानाला हवे बळ

File photo
File photo

नांदेड : ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबातील महिला वर्षभर शेतात राबतात. प्रसंगी अंग मेहनतीची अवजड कामेही त्या करतात. शेतीबरोबर व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून पूरक व्यवसाय करून स्वावलंबी बनण्याचा प्रयत्नही करीत आहेत. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे, बाजारपेठांतील भावांमुळे त्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे कमी कालावधीची व कमी खर्चाची पिके घेऊन तंत्रशुद्ध शेती त्यांना करता यावी, म्हणून त्यांच्या शेतीतील योगदानाला बळ देण्याची गरज आहे.

शेतीच्या कामात महिलांचा मोठा सहभाग
खरीप असो की रब्बी हंगाम, शेतीत महिलांचे योगदान किती मोठे असते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून, किंबहुना मोठे योगदान देऊनही महिला श्रेयापासून दूरच राहत असल्याचे दिसून येते. संकटांशी आणि आव्हानांशी सामना करण्याची उपजत वृत्तीच त्यांना शेतीत काम करण्याचे बळ देत असते. शेतीशिवारात मशागतीसह काडी-कचरा वेचणे, निंदणी, कोळपणी, पेरणी, बियाणे तयार करण्यासह उत्पादन येईपर्यंत महिलांचा सहभाग अधिक असतो. पुरुषांचा कल मात्र आर्थिक फायद्यांपुरता म्हणजे कारभार पाहण्यापुरता मर्यादित असतो.  

या कारणामुळे मिळत नाही योजना
शेतीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांना सामावून घेतले जात नाही. अनेकांनी तर केवळ शासकीय योजनांच्या लाभासाठी महिलांच्या नावांवर जमिनी केलेल्या आहेत. शेतकरी कुटुंबात शेतीचा सात-बारा महिलांच्या नावावर असला तरी, प्रत्यक्षात शेती करणाऱ्या महिलांचे कर्तृत्व जगासमोर पाहिजे त्या प्रमाणात प्रकर्षाने येतच नाही. शेतीतील संकटेही शेतात काम करणारी महिला समजू शकते आणि तिच्या आवड व कौशल्यानुसार तिला शेतीकाम फार उत्तमही जमते. 

शेतकरी महिला महत्त्वाची कडी
शाश्वत शेतीकडे नेणारी शेतकरी महिला ही महत्त्वाची कडी आहे. संसार काटकसरीने करणारी शेतीचा कारभार पाहतानाही व्यावहारिक दृष्टिकोनाचा प्रत्यय आणून देते. तिला शेतात रसायने कमी वापरावीत हे व्यवस्थित समजते. कोणते पीक घ्यायचे, नांगरणी, ट्रॅक्टर, फवारणी, बैलजोडी, शेतमाल, सोंगणी, चारा पाणी आणि घरातली कामे महिलांच्या वाट्याला येतात. मात्र, तिला निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतले जात नाही, हे दुर्दैव आहे.

  1. शेतकरी, शेतमजूर महिलांना शासनाचे पाठबळ आवश्यक
  2. शेती पतीच्या नावे असल्याने महिलांना बॅंकेचे कर्ज मंजूर होत नाही
  3. शेतकरी मेळावे, प्रशिक्षण कार्यक्रमांमध्येही महिलांना नगण्य स्थान असते
  4. शेती व शेतीपूरक उद्योगांना गती देण्याची गरज
  5. शेतीपूरक उद्योजकांनीही पुढाकार घेण्याची गरज
  6. गावागावांत प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज
  7. शेतीमाल साठवणुकीाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञानाची गरज

विक्री व्यवस्थेत व्हावा बदल
देशातील प्रत्येक मालावर किमान विक्रीमूल्य छापलेले असते. मात्र, शेतीमालावर कोणतेही मूल्य नसते. शेतीमालाला चांगले दर मिळण्यासाठी विक्री व्यवस्थेमध्ये बदल करणे आवश्यक आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतकऱ्यांची पिळवणूक रोखण्यासाठी विदेशी थेट गुंतवणुकीला (एफडीआय) परवानगी देऊन पर्यायी शेतीमाल विक्रीची व्यवस्था उभारण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com