
प्रशांत केणी
जून महिन्यात टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी आपल्या लाडक्या विठ्ठल माउलीचे दर्शन घ्यायला पंढरपूरकडे वाटचाल करतात. एव्हाना वारकऱ्यांनी महाराष्ट्रातील वातावरण भक्तीमय झाले आहे. गेली तीन वर्षे जून महिना महाराष्ट्र आणखी एका खास वारीसाठी ओळखला जातो, तो म्हणजे महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या (एमपीएल). हिरव्यागार सृष्टीसौंदर्याच्या सान्निध्यात वसलेल्या गहुंजेच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पावसाची तमा न बाळगता यंदाचा तिसरा हंगाम रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील क्रिकेटच्या वारकऱ्यांचा यशस्वीपणे पार पडला. या वेळी मागील दोन हंगामांमधील विजेत्या रत्नागिरी जेट्सला जेतेपद टिकवण्यात अपयश आले, तर ईगल नाशिक टायटन्स हा संघ तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला. यंदाच्या हंगामाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांची आणि पुरुषांची अशा दोन्ही लीगचे शिवधनुष्य ‘एमसीए’ने यशस्वी पेलले.