मिळालेल्या अधिकारांचे व्यवस्थापन कसे करावे?

management.
management.

आपण रोज काहीतरी नवीन शिकत असतो किंवा असं म्हणता येईल की, परिस्थिती आपल्याला रोजच नवीन काहीतरी शिकवत असते. मात्र, आपण जे शिकतो, ते आपल्या किती लक्षात राहतं किंवा आपण त्याचा किती वापर करतो, हा प्रश्नच आहे. आणि प्रश्‍न महत्त्वाचे असतातच. प्रश्न विचारण्याची नितांत गरज आहे. प्रश्न पडल्याशिवाय आपलं पाऊल पुढे टाकले जाणार नाही. पडलाय ना पुन्हा प्रश्न?
अर्जुनाला कळेना कृष्ण बोलतोय तरी काय? जेव्हा महाभारतात भीमाचा मुलगा घटोत्कच कर्णाने प्रयोग केलेल्या इंद्राच्या वासवी शस्त्राने मारला गेला. ही वासवी शक्ती इंद्राने कर्णाला दिली होती; त्याचा फक्त एकदा प्रयोग करता येईल या हिशेबाने. एकदा का तिचा प्रयोग केला, की ती इंद्राकडे परत जाईल. घटोत्कचाच्या सामर्थ्यामुळे तो कौरव सैन्यावर कहर करीत होता, त्याने कौरवांना हैराण करून सोडले होते आणि शेवटी नाइलाजाने इंद्राच्या वासवी शक्तीचा वापर करून कर्णाने त्याला ठार मारले. त्या रात्री पांडवांमध्ये शोककळा पसरली होती. सगळेच दुःखी होते आणि तितक्‍यात कृष्ण हसत, टाळी देत तिथे आला. अर्जुनाने त्याला बाजूला नेले आणि शांत केले. अर्जुनाला प्रश्न पडला होता की, कृष्णाच्या या वागण्यामागे कारण तरी काय असेल? मात्र कृष्णाच्या उत्तराने अर्जुनाला निशब्द केले.
कृष्ण म्हणाला घटोत्कचाला नियंत्रित करण्यासाठी कौरवांना हा बेत आखावा लागला. घटोत्कच एक राक्षस होता, तो भीमाचा पुत्र असला तरीही. त्याने कौरवांना हैराण केले. मात्र, पुढे त्याला त्या ठिकाणी ठेवणे पांडवांसाठी कठीण झाले असते आणि पुढे कृष्ण म्हणाला की, जर घटोत्कच मारला गेला नसता, तर ते वासवी शस्त्र कर्णाने अर्जुनासाठी ठेवले होते. तेव्हा युद्धनीतीप्रमाणे घटोत्कचाचे जाणे पांडवांसाठी जीवनदान होते. कृष्ण पुढे म्हणाला, युद्धाच्या काळी जो अतिउन्मत्त आपल्या कामी येतो तोच शांततेच्या काळात डोईजड होतो. तेव्हा अर्जुनाची क्षुधा शांत झाली आणि त्याच्या लक्षात आले की, कृष्ण का शांत आणि आनंदी आहे. हे कृष्णाचे पुढच्या दृष्टीने कॉन्फ्लिक्‍ट मॅनेजमेंट म्हणजे भविष्यातील होणाऱ्या संघर्षाचे व्यवस्थापन होते.
कधी कधी व्यवस्थापनात आपल्याला अशा काही गोष्टी दिसून पडत नाही. थोडा विचार केला, तर दोन बाजू लक्षात येतील. पहिली बाजू जो व्यवस्थापन करतो आहे त्याची आणि दुसरी बाजू ज्याचं व्यवस्थापन केल्या जात आहे त्याची. जसे कृष्ण व्यवस्थापन करत होता घटोत्कचाचे, तसाच काहीतरी प्रकार आपणही करत असतो बहुदा. कधी कधी काही गोष्टी आपण सहज दुर्लक्षित करत असतो. आपल्याला बहुदा लक्षात येत नाही की, एखादी व्यक्ती ज्याला आपण सर्वाधिक अधिकार दिलेले असतात ती कधी उन्मत्त होत जाते. मिळालेल्या अधिकारात ती व्यक्ती इतकी गुंग असते की, पुढे आपल्यासाठी कधी ती काळ होईल हे लक्षात येण्याआधी वेळ निघून गेलेली असते. संकटाच्या काळात जी व्यक्ती आपल्या अतिशय महत्त्वाची असते, तीच व्यक्ती आपल्याला अपाय करू शकते याची बहुदा जाणीव होत नाही. तेव्हा पुढे व्यवस्थापन कठीण होत जातं. याचा अर्थ त्या व्यक्तीचा काटा काढावा, असे नाही तर त्या व्यक्तीसंदर्भात व्यवस्थित निर्णय घेणे गरजेचे असतात. संकटात मिळालेले अधिकार याचा सुकाळात व्यर्थ वापर होऊ न देणे याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे. तेव्हा व्यवस्थापन करताना आपण कोणाला कधी आणि किती अधिकार देतो आहोत आणि त्याचा पुढे कसा वापर होणार आहे याची काळजी व्यवस्थापन करताना घेणे गरजेचे. सोप्या शब्दांत अधिकार वा सत्ता यामुळे कोणालाही उन्मत्त न होऊ देणे म्हणजे खरे व्यवस्थापन.
याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे, ज्याचे व्यवस्थापन करण्याची गरज पडते आहे ती व्यक्ती. खऱ्या अर्थाने, नोकरी असो व नाते, कोणत्याही अधिकाराने वा मिळालेल्या मानाने, सत्तेने स्वतःला उन्मत्त होऊ न देणे म्हणजे स्वतःचे आणि स्वतःच्या अधिकारांचे कर्तव्यपूर्ण व्यवस्थापन करणे ही जाणीव असलेल्या व्यक्तीवर त्याचे व्यवस्थापन इतर कोणी करावे याची पाळीच येत नाही बहुदा.
प्रत्येकाची त्याचे कर्तव्य पार पडण्याची एक वेळ असते. संकटाच्या काळी दिलेल्या साथीला जर व्यवसायाचा भाग बनवला, तर व्यवस्थापनाची वेळ आल्याखेरीज राहत नाही हे नक्की. आपण आपला घटोत्कच होऊ न देणे इतके मात्र महत्त्वाचे. विचार करून बघा!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com