जेम्स मिल, कॅथरीन मेयो आणि आपण

elephant-died
elephant-died

1925 च्या सुमारास अमेरिकन लेखिका आणि इतिहासकार कॅथरीन मेयो भारतात आल्या. पाच महिने भारतात राहून, गांधीजींपासून तर अनेकांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या. देशातील अन्य समस्यांचा अभ्यास केला आणि त्यानंतर 1927 मध्ये "मदर इंडिया' नावाने तिचे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाने संपूर्ण भारतात खळबळ उडवून दिली. हे पुस्तक भारताची जागतिकस्तरावर निंदा नालस्ती करण्यासाठीच लिहिले गेले असण्याची शक्‍यता आहे. चार वर्षांत या पुस्तकाच्या असंख्य आवृत्ती निघाल्या. त्यातील अनेक गोष्टी अतिशयोक्तीपूर्ण होत्या आणि विशेष म्हणजे हे पुस्तक वर्णभेदाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या बाई रंगाने गोरी असलेली माणसेच केवळ राज्य कारभार करायला लायक आहेत आणि नैतिकदृष्ट्या भ्रष्ट असलेली काळी माणसे ही गुलामीच्या लायकीची आहेत हे सांगून मोकळ्या झाल्या. गांधीजींनी या पुस्तकाचे वर्णन सफाई निरीक्षकाचा अहवाल असे केले. परंतु, शिकागो इवनिंग पोस्टने तर या पुस्तकाची तुलना जगप्रसिद्ध इटालियन लेखक दांतेच्या साहित्याशी केली.
दुसरे एक ब्रिटिश इतिहासकार होऊन गेले जेम्स मिल. भारतात कधीही न येता त्यांनी "हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया' हा ग्रंथ लिहिला. वसाहतवादी इतिहास लेखनाचा तो उत्कृष्ट नमुना आहे. यात मिल यांनी मांडलेली भारताबाबतची मते द्वेषपूर्ण असून भारतीय माणूस हा स्वार्थी, अप्पलपोटा, दळभद्री, असंस्कृत, असभ्य, बर्बर आणि खोटारडा असल्याचा निर्वाळा त्याने दिला आहे. विशेष म्हणजे भारतातून जे विद्यार्थी आय. सी. एस. ची परीक्षा द्यायला जात असत त्यांच्या अभ्यासक्रमात हे पुस्तक समाविष्ट होते.
कोणत्याही संवेदनशील भारतीय मनाला हे वाचून वेदना झाल्याशिवाय राहणार नाही. ही मांडणी बोचणारी नक्कीच आहे पण जेम्स मिल, कॅथरीन मेयो यांच्या वर्णद्वेषी मांडणीकडे एकवेळ दुर्लक्ष केले तरी त्यांनी भारतीय समाजाबाबत नोंदवलेल्या निरीक्षणाच्या आधारे जेव्हा आपण आजच्या भारतीय समाजाचे आकलन करतो तेव्हा मात्र वरील लेखकांनी मांडलेली मते दुर्लक्षिता येत नाहीत. दांभिकता मग ती राजकीय असो की सामाजिक आमचे व्यवछेदक लक्षण ठरले आहे. भ्रष्टाचाराच्या बाबत सरकार भ्रष्ट आहे हे म्हणणे सयुक्तिक नसून भ्रष्टाचारासाठी सरकार आहे असे म्हणणे योग्य ठरेल. जितक्‍या जास्त विकासाच्या गप्पा तितका अधिक भ्रष्ट आचार हे आता समीकरण आहे. दुर्दैवाने जनतेचा पैसा लुटताना आम्ही हे सारे जनतेसाठी करतोय याचा आव आणणे यासारखी दांभिकता नाही! दु:ख याचे नाही की भ्रष्टाचार आहे; दु:ख याचे आहे की आताशा तो सर्वमान्य झाला आहे. समाजाला त्याचे काही वाटेनासे झाले आहे.
कायदा सगळ्यांसाठी समान असतो असे म्हणतात. मात्र, भारतात तो काहींसाठी विशेषत्वाने समान असतो. नामिबियासारख्या गरीब देशात राष्ट्रपतींनी आपल्या मित्रांसोबत कोरोना प्रतिबंधाच्या काळात घरीच पार्टी केली आणि परिणाम म्हणून प्रशासनाने त्यांना जबर दंड ठोकला आणि राष्ट्रपतींनी तो निमूट भरला. आमच्या देशात एखाद्या पक्षाच्या टीनपाट कार्यकर्त्यावर कारवाई करताना प्रशासनाला घाम सुटतो. ही हुजरेगिरी आमच्या रक्तात भिनलीय त्याचे काय?
सरकारी अनुदानावर किंवा जनतेच्या दानावर गब्बर झालेल्या समाजसेवी संस्था, दलित व आदिवासींच्या कल्याणासाठी होणाऱ्या त्यांच्या पंचतारांकित बैठका आमच्यातील दांभिकता, खोटारडेपणा अधोरेखित करतो. विदेशात अडकलेल्या भारतीयांना आणताना वंदे भारत योजना रात्रीतून तयार होते. मात्र, देशातील प्रवासी मजूर वर्गासाठी आमचे मन पाझरत नाही. उपाशी पोटी हजारो किलोमीटरचा प्रवास ते आपल्या लहान लेकरांना घेऊन करतात आणि आमचे शासन, प्रशासन राजकारण करण्यात गर्क असते याला काय म्हणावे? राज्य सरकार केंद्रावर खापर फोडणार आणि केंद्र राज्यावर ढकलणार. अरे पण तुमच्या टोलवाटोलवीत गरीब माणूस हकनाक मेला. या सामान्य माणसांना राजकीय आवाज नाही म्हणून ते आज असंवेदनशील सरकारकडून प्रताडल्या गेले. जी गोष्ट सरकारची तीच सामान्य माणसाची. आमची अभिव्यक्तीदेखील आता सिलेक्‍टिव आहे हे वेगळे सांगायला नको. लहान लहान मुली जेव्हा अनेकांच्या वासनेची शिकार होतात तेव्हा आम्ही कुठल्या तोंडाने स्वतःला सभ्य म्हणवू शकतो? एका निष्पाप आणि गर्भवती हत्तिणीच्या तोंडात फटाक्‍यांनी भरलेला अननस कोंबणारे सुसंस्कृत कसे असू शकतात? एकेकाळी आम्ही सभ्य आणि सुसंस्कृत होतो असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा आज अध:पतित झालेला समाज बघून त्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? समाजाच्या विकासाचा क्रम हा अंधाराकडून प्रकाशाकडे असतो. आमचा प्रवास अंधाराकडून अंधाराकडे आहे असे म्हणायचे का? संरक्षणावरची आर्थिक तरतूद वाढवत नेल्याने समाज प्रगत होतो का? की माणसातील माणूसपणाच्या जागरणाने समाज प्रगत होतो? हे प्रश्न आज डोक्‍यात गोंधळ निर्माण करतात. मग जेम्स मिल, कॅथरीन मेयो यांच्या मांडणीकडे जेव्हा आपण वळतो तेव्हा आजदेखील त्यांची काही मते प्रासंगिक वाटू लागतात. त्यांनी आपल्याला लावलेल्या विशेषणांचा कधीतरी साकल्याने विचार आपण करणार आहोत की नाही?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com