दुर्योधन आणि मी, एक तुलनात्मक व्यवस्थापन !!

duryodhan.
duryodhan.

जानामि धर्मम् न च मे प्रवृत्तिः ।
जानामि अधर्मम् न च मे निवृत्तिः ॥
दुर्योधनाचे हे शब्द आज कदाचित कितीतरी लोकांवर शोभतील असे आपण म्हणू शकतो. दुर्योधन म्हणतो, धर्म काय आहे ,याची मला माहिती आहे आणि अधर्म काय आहे याची मला जाणीव आहे पण धर्माची माझी प्रवृत्ती नाही आणि अधर्मापासून माझी निवृत्ती नाही वा मी ती होऊ देत नाही. खऱ्या अर्थाने पहाल तर एक जाणीव आपल्यालाही होईल, कि एखादी गोष्ट जेव्हा एखादी व्यक्ती करते, वा आपण स्वतः ती करतो तेव्हा ती चांगली वा वाईट याचीही आपल्याला बहुदा कल्पना असते. पण कल्पना असूनही आपण ती करतो कारण त्यावेळी परिस्थिती आपल्याला तसं करायला भाग पाडते. काही ठिकाणी काळ आणि कारणं या वागणुकीला कारणीभूत असतात. दुर्योधन एक उत्कृत्ष्ट राजा बनू शकला असता आणि त्या माणसात त्या पदाला लागणारी सर्व पात्रता होती, फक्त एक सोडली तर....आणि ती म्हणजे असूया.

व्यक्ती नकारात्मक सुरवातीपासून कधीच नसतो. तपासून पहा वाटल्यास. परिस्थिती, सभोतालचे वातावरण, घडत येणाऱ्या गोष्टी , इत्यादी अनेक व्यक्तीला नकारात्मक विचारांचा करायला पुरेशा ठरतात. आणि प्रत्येक व्यक्ती घडलेल्या प्रत्येक गोष्टीला एक धडा वा शिकवण म्हणून घेईलच असे नाही. त्यावर ही दिव्य म्हणजे , जर आजूबाजूला शकुनी सारखा मामा असला तर ? पण असे म्हणतात, तो ही आला होता सूडाच्या भावनेनेच , तेव्हा त्याने जे केले ते......असो. दुर्योधन मात्र स्वतः च्या विचारांना आळा घालू शकला नाही.

दुर्योधन स्वतः म्हणतो सुद्धा,
केनापि देवेन हृदिस्थितेन, यथानियुक्तोSस्मि तथा करोमि ।।
कोणीतरी एक देव आहे जो माझ्या हृदयात वास्तव्य करून आहे , तो जसा करवतो , मी तसेच करत जातो.
कोण असेल बरं हा देव? आजची परिस्थिती जर याच्याशी जोडली, तर असं दिसेल की हा देव दुसरा तिसरा कोणी नसून आपली इच्छा आहे. यालाच आपण पुढे कामना, वासना अशा नावांनीही संबोधतो आपण. जेव्हा एखाद्या साध्या आणि साध्य इच्छेला, सूड, मत्सर वा असूया, राग, अति लोभ, दंभ, भय अशा नको असलेल्या बाबी समाविष्ट होतात तेव्हा त्याचे रूपांतर मग वासनेत होते. ती मग सत्ता, नेतृत्व, प्रेम, पैसा कशाचीही का असेना, आपल्या नकळतच आपल्याला नाकारात्मकतेकडे ती नक्कीच नेते. मग घर असो वा ऑफिस, हे नकारात्मक नेतृत्व फक्त स्वतःचा विचार करण्याचीच सुबुद्धी देत असतं आणि जे होत नाही ते व्यवस्थापन मग जगजाहीर होत.

नकारात्मक नेतृत्वाच चक्र जरा कुश्चित च आहे. एकदा सुरु झालं कि ते मग पिढ्यांना गुरफटत नेतं . कधी काळी कोण्या एकामुळे सुरु झालेली असूया, किती पिढ्यांना पुढे गढूळ करील याचा कोणालाच ती सुरु होताना अंदाज येत नाही. आता पहा ना, दुर्योधन नकारात्मक नेतृत्वाचा एक न विसरणारा असा पुतळाच झाला. मात्र त्याच्या आधी हे त्याला दिल कोणी याचा कोणी विचारच केला नाही. जसे आपण आधी बोललो आहोत, बुद्धीने अंध सिंहासनाच्या प्रेमात असलेला त्याचा पिता धृतराष्ट्र त्याला कधी भाऊ बंदकी शिकवूच शकला नाही कारण त्याच्या मनात ती होती का हा प्रश्न आधी पडतो. थोड आणखी मागे गेलं, तर मत्स्यगंधा म्हणजेच सत्यवती, तिने काय केले भीष्मासोबत हेहि आपल्याला माहिती आहे.आणि असेच पुढेही, मग सांगा दुर्योधन नकारात्मक नेतृत्व नाही तर काय स्वीकारेल ? वरून पांडवानी लहानपणी च त्याच्या मनात स्वतःविषयी नको ची भावना निर्माण केली स्वतःच्या बुद्धी आणि शक्ती प्रदर्शनानें. तिथे त्याला भीती ने आधीच गाठले कि आपण आपला टिकाव करणार तरी कसा? अशा सगळ्या वातावरणात व्यक्ती एकच गोष्ट अवलंबवतो आणि ती म्हणजे वर्चस्व. साम दाम दंड भेद , काहीही करून स्थापन करता यावे ते वर्चस्व.

दुर्योधनाने तेच केले आणि लोकांपुढे आले ते नकारात्मक नेतृत्व. त्याला कृष्णाचीही मग फक्त नारायणी सेना म्हणजे शक्तीच दिसली पण स्वतः कृष्ण म्हणजे धर्म आणि बुद्धी दिसली नाही. आता विचार करून बघा, अश्या किती गोष्टी आहेत ज्यांचा आपण खरंच खुल्या मनाने विचार केला. आयुष्यातल्या कितीतरी घटनांचा परिणाम म्हणजे आजचे जे आता आपण आहोत ते. पण आज चा मी खरंच माझं येणाऱ्या आयुष्याचं वा करिअर च भवितव्य चांगलं करेल का ? माझा दुर्योधन किती झालाय आणि त्याहून महत्वाचं माझ्या आताच्या अस्तित्वाने म्हणजेच वागण्या बोलण्याने कोणाचा दुर्योधन तर होत नाहीये ना ? एकदा का या प्रश्नांची उत्तर स्वतः दिली, तर जे पुढे करता येईल, ते म्हणजे स्वतःशीच केलेलं एक तुलनात्मक व्यवस्थापन. !!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com