मन एकाग्र करणारा प्राणायामाचा चैतन्य यज्ञ

meditation_
meditation_

"प्राणायाम' या भारतीय जनमानसात खोलपर्यंत रुजलेल्या पद्धतीला नक्की सुरुवात कधी झाली हे सांगता येणे कठीण आहे. "प्राण' या शब्दाचा उल्लेख वेदांमध्ये सापडतो, प्राणायामाचा उल्लेख बृहदारण्यक उपनिषदात आहे. मैत्रायणी उपनिषदात प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, तर्क समाधी इत्यादींवर विवेचन आहे. श्रीमद्‌ भगवत गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात,
अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे ।
प्राणापानगती रूद्धवा प्राणायाम परायणा: (अ. 4 श्‍लो. 29)
प्राणायाम हा एक प्रकारचा यज्ञ असल्याचे श्रीकृष्ण सांगतात. योगीपुरुष अपानात प्राणाचे होम करतात (पूरक) किंवा प्राणात अपानाचे होम करतात (रेचक) किंवा प्राण व अपान दोघांचेही अवरोध करून प्राणायामाचे परायण करतात. अर्थात प्राण व अपानाचे अवरोध करून केवळ कुम्भक करतात. (शंकरभाष्य)
प्राणायाम हा संस्कृत शब्द "प्राण' व "आयाम' या दोन शब्दांच्या संधीने तयार झाला आहे. प्राण अर्थात चैतन्य व आयाम म्हणजे विस्तृत करणे. आपल्या चैतन्याच्या सीमा विस्तृत करणे, हा प्राणायामाचा साधा अर्थ होतो.

प्राणायामाचे विस्तृत विवरण महर्षी पतंजली यांच्या योगसूत्रात दिसून येतं. योगाच्या आठ अंगांपैकी प्राणायामाचा क्रमांक चौथा येतो. परंतु, प्राणायामाचे महत्त्व महर्षींच्या मते पुढच्या पायऱ्या, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी यांच्यापर्यंत पोहोचण्यापुरतेच आहेत. प्राणायाम म्हणजे श्‍वासाचे व्यायाम, असा प्रचलित अर्थ आहे, पण हा तेवढाच मोठा गैरसमजसुद्धा आहे. प्राण म्हणजे चैतन्य, जीवनदायिनी ऊर्जा. ही ऊर्जा नखशिखान्त आपल्या आत पसरली पाहिजे. परंतु, या ऊर्जेला पोषक असं शुद्ध वातावरण आपल्या आत असायला हवं. म्हणून महर्षी पतंजली यांनी आधी यम व नियम यांचा क्रमांक लावला आहे.
त्यानंतर येतात आसनं. आसन अर्थात बसण्याची व्यवस्था. प्राणायाम करायला सुरुवात करताना बैठक अशी हवी की वारंवार बदलावी नाही लागली पाहिजे. वा सारखं लक्ष तिकडे जायला नको. पतंजली म्हणतात, "स्थिरसुखम्‌ आसनम' (2.46). बैठक स्थिर व सुखदायी असली पाहिजे. त्याशिवाय चित्त एकाग्र करता येत नाही. वेगवेगळी योगासने प्रचलित आहेत. त्यांचा उद्देश्‍य शरीराची लवचिकता व स्वास्थ्य उत्तम ठेवणे एवढाच आहे जेणेकरून पुढच्या पायऱ्या काबीज करणे सोपे होते. कुठल्या प्रकारचं शारीरिक दु:ख नसेल तरच एकाच स्थितीत बऱ्याच वेळ स्थिर बसणं शक्‍य होतं. योगासने प्राणायामाच्या आधी का करावी? याचं उत्तर आपण पुढे बघू. पूरक अर्थात श्वास आत घेणे व रेचक अर्थात श्वास सोडणे, ही प्राणायामाची मुख्य अंगे आहेत. यांचा बाह्य व अंतर्गत, संख्या व लांबी प्रमाणे वृत्ती अर्थात प्राणायामाचे प्रकार असतात. महर्षी पतंजलींनी प्राणायामाच्या प्रकारांबद्दल याशिवाय काही विवरण योगसूत्रांत केलेलं नाही. प्राणायामाचा केवळ उद्देश्‍य मन एकाग्र करणे व प्राणऊर्जेचा संपूर्ण शरीरात प्रसार करणे आहे.
तर ही प्राणऊर्जा म्हणजे काय? प्राणायामाचा अर्थ केवळ विशिष्ट प्रकारचा श्वासोच्छ्वास नव्हे तर श्वासाच्या मागे जी ऊर्जा असते तिचे नियंत्रण करणे, असा होय. आपल्या प्रत्येकाच्या शरीरात ऊर्जा असते. ही ऊर्जा वातावरणात पण असते. हिचा उल्लेख वैश्विक ऊर्जा किंवा "कॉस्मिक एनर्जी' असा केला जातो. पूर्वी योगीपुरुष काहीही न खाता पिता वर्षानुवर्षे तप करायचे. त्यांना या वैश्विक ऊर्जेचा विनियोग करायची पद्धत ज्ञात होती. जेव्हा आपण श्वास आत घेतो तेव्हा ही ऊर्जा पण आपल्या शरीरात प्रविष्ट होते. यावेळेला मन एकाग्र करून जर कल्पना केली की ही ऊर्जा माझ्या शरीराच्या अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म पेशीपर्यंत पोहोचते आहे तर नक्कीच संपूर्ण शरीरात चैतन्याचा संचार होतो व सर्वांत सूक्ष्म पेशीसुद्धा या ऊर्जेचा विनियोग करण्यात सक्षम होतात. या पेशींपर्यंत ऊर्जा कुठल्या स्वरूपात पोहोचते व त्या ऊर्जेचा विनियोग कसा केला जातो, याविषयावर वैज्ञानिक अनेक वर्षे संशोधन करत होते. 1937 साली हॅन्स अडोल्फ क्रेब या वैज्ञानिकाला याविषयावर संशोधनासाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्याचा सन्मानार्थ ऊर्जेचा विनियोग करण्याचा या प्रक्रियेला "क्रेब्स सायकल' असे नाव दिलं गेलं.
ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी पेशीपर्यंत प्राणवायू अर्थात ऑक्‍सिजन पोहोचणे आवश्‍यक आहे व ऑक्‍सिजनचा पुरवठा जर रक्ताभिसारण अखंड असेल तरच होणार! उचित योगासने केल्याने रक्ताभिसारण संपूर्ण शरीरात योग्य पद्धतीने होतं व ऑक्‍सिजनचा पुरवठा होतो. त्यानंतर प्राणायाम केल्याने प्राणवायू व चैतन्य ऊर्जा संपूर्ण शरीरात प्रसरण पावते. आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती किती आहे, हे आपल्या शरीरातल्या किती प्रमाणात पेशी ऊर्जेचा विनियोग कसा करतात, यावर बऱ्यापैकी अवलंबून असते. कुठलीही वस्तू जर वापरली नाही तर ती ठेवल्या ठेवल्या खराब होते हा आपला सर्वांचाच अनुभव आहे.
योगासने व प्राणायाम केल्यामुळे संपूर्ण शरीराच्या पेशींचा व्यायाम होतो व त्या ऊर्जामयी होतात. सर्व बाह्य व आंतरिक (हृदय, यकृत, मूत्रपिंड इत्यादी) अवयव तेजोमय होतात. याबरोबरच प्राणायाम केल्यामुळे फुप्फुसांचा पण व्यायाम होतो. प्राणायाम करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपले फुप्फुस हा शरीराचा अत्यंत नाजूक भाग आहेत. अतिजोरात श्वासोच्छ्वास केल्याने यांना इजा होऊ शकते. म्हणून प्राणायाम करताना खूप जोरात किंवा झटक्‍याने तर श्वासोच्छ्वास केला जात नाही ना याची काळजी घेणे आवश्‍यक आहे.
साधारणपणे श्वास घेताना म्हणजे आपण काही शारीरिक हालचाल करत नसताना जो श्वासोच्छ्वास केला जातो त्यात फुप्फुसांची अर्धीच क्षमता वापरली जाते. व्यायाम केल्यावर ही क्षमता सत्तर टक्‍क्‍यांपर्यंत जाते. न वापरल्या जाणारी उरलेली क्षमता प्राणायामाने सौम्यपणे कामात आणली जाऊ शकते. फुप्फुसांच्या बरोबर संपूर्ण श्वसनमार्ग प्राणायामाने मोकळा होतो.

प्राणायामावर प्रत्येक योगगुरूने आपल्या पद्धतीने विवेचन केले आहे. कुठल्याही पद्धतीचे अनुसरण केले तरी प्राणायामा मागचा भाव मनात ठेवला नाही तर त्याचा संपूर्ण लाभ होणार नाही. म्हणून प्राणायाम करताना एकाग्र चित्ताने श्वासाद्वारे प्रविष्ट होणारी ऊर्जा सम्पूर्ण शरीरात अगदी शेवटच्या अणुरेणूपर्यंत पोहोचून प्रत्येक पेशीला ऊर्जायमान, शक्तिमान करते आहे, अशी कल्पना करावी. ही ऊर्जा आपण सर्वांना नक्कीच उत्तम शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक चैतन्य देण्यास समर्थ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com