मूलभूत प्रश्नांवर आपण कधी बोलणार?

Three_Monkeys
Three_Monkeys

तीन महिन्यांपूर्वी म्हणजे जून महिन्यात एका भारतीय कलाकाराचा मृतदेह त्याच्या खोलीत सापडला. त्याचा खून झाला किंवा त्याने आत्महत्या केली हे अद्याप कळले नाही. तेव्हापासून संपूर्ण भारताला किंवा भारतातील माध्यमांना फक्त आणि फक्त त्या घटनेचे वेध लागलेले दिसत आहेत. त्या घटनेनंतर कोरोना, पूरस्थिती, बेरोजगारी, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था अशी बरीच संकटे सतत भारताला प्रश्न विचारत आहेत. एवढे असूनही एक-दोन माध्यमांचा अपवाद सोडला तर कुणीच या खऱ्या प्रश्नांबद्दल बोलत नाही. हा जोमात सुरू असलेला खेळ सर्वांनाच माहिती आहे, तरी मी हे लिहिण्याचा खटाटोप का करतोय हे बघूया.

महात्मा गांधीजींची तीन माकडे भारतात बरीच प्रसिद्ध आहेत. या तीन माकडांपैकी एकाने डोळे झाकलेले आहेत, दुसऱ्याने कान तर तिसऱ्याने तोंड झाकलेले आहे. या तीन माकडांच्या तत्त्वज्ञानाचे मूळ जपान या देशातील आहे. साधारणपणे सतराव्या शतकापासून या तत्त्वज्ञानाचा उपयोग होताना दिसतोय.

वाईट बघू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका” अशी शिकवण या माकडांच्या माध्यमातून देण्यात येते. शांतता आणि सहनशीलतेच्या प्रचारात या तत्त्वज्ञानाचा महात्मा गांधींनी उपयोग केला. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी नक्कीच या तत्त्वाची गरज होती आणि त्याला यश सुद्धा मिळाले. भारतीय समाजाने उत्तमरीत्या हे तत्त्वज्ञान अंगीकृत केलेले दिसतेय फक्त त्याची दिशा थोडी भरकटत गेली. या उदाहरणातील वाईट हा शब्द गळून त्याची जागा आता “सत्य” या शब्दाने घेतलेली आहे. आणि एक नवीन तत्त्वज्ञान किंवा एक नवीन जगण्याचा मार्ग यातून निर्माण झाला तो म्हणजे “सत्य बघू नका, सत्य ऐकू नका आणि सत्य बोलू नका”.

सन २०१३ मध्ये एडवर्ड स्नोडेन या अमेरिकन व्यक्तीने अमेरिकन गुप्तचर संस्था कशाप्रकारे काही जागतिक पातळीच्या संस्थांसोबत मिळून लोकांवर पाळत ठेवत आहे हे उघडकीस आणले होते. याप्रकारचे प्रयत्न इतरत्रही होताना दिसत असतातच. जरी एडवर्ड स्नोडेन याने लोकहितासाठी हे प्रकरण उघडकीस आणले पण त्यालाच खलनायक म्हणून घोषित करण्यात आले. त्याच्यावर देशद्रोहाचा आणि असे विविध खटले चालवण्यात आले. तर मुद्दा असा की सत्याची बाजू घेऊन आणि खरे बोलून त्याने स्वतःच्या पायावर जणू कुऱ्हाड मारून घेतली. अशी उदाहरणे आपल्याला समाजात सर्वत्रच दिसून येतात.

अगदी छोट्या छोट्या स्वार्थासाठी आणि हितसंबंधासाठी आपण सत्याची बाजू घेत नाही. खूप हिंमत करून कुणी सत्य बोलायचा प्रयत्न केला तर त्याचे भयंकर दुष्परिणाम त्या व्यक्तीला सोसावे लागतात. हे बघून मग इतर कुणी सत्याची बाजू घेण्यासाठी प्रयत्नसुद्धा करीत नाही.

वर नमूद केलेला कलाकाराच्या विषयाला किती महत्त्व द्यायचे हे मी ठरवू शकत नाही आणि त्याचा मला अधिकार पण नाही. सध्या भारताची परिस्थिती बघितली तर आपल्या देशाला भेडसावणारे अगदी मूलभूत असे बरेच प्रश्न आहे. ते सर्व प्रश्न विसरून भारतीय समाज आणि माध्यमे फक्त त्या कलाकाराच्या घटनेला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सतत चालवत बसले आहेत. त्या घटनेबद्दल कितीही चर्चा केली तरी त्यातून सकारात्मक काहीच निघणार नाही तरीही इतक्या उत्स्फूर्तपणे का सर्वच त्यामध्ये सहभागी होत असतील ? तर त्याचे कारण असे की त्या चर्चेमध्ये सहभागी होण्याकरिता तुम्हाला कुठलीच सत्याची बाजू घ्यावी लागत नाही आणि खोट्या व अर्धसत्य गोष्टीचे मनोरे बांधायचे स्वप्न पूर्ण होते ते वेगळच.

एक समाज म्हणून आणि एक देश म्हणून आपण सध्या खूप कठीण परिस्थितीतून जात आहोत. एक सुजाण नागरिक म्हणून आवश्यक त्या वेळेवर सत्याची बाजू न घेतल्याने आज आपला देश वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक खड्ड्य़ात जात आहे. पण याची सुरुवात बरीच आधी झाली होती. जेव्हा स्वतःचा स्वार्थ आणि हितसंबंध जोपासणे हे प्राथमिक झाले अगदी तेव्हापासूनच आपल्या समाजाची अधोगती सुरू झाली होती. आता जे काही दिसत आहे ते तर त्याचे फक्त परिणाम आहेत, आणि त्या परिणामांची तीव्रता दिवसेंदिवस आणखी जाणवायला लागणार आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सरकारी मालमत्तेचे खाजगीकरण, कोसळती न्यायव्यस्था ही तर जणू सुरुवात आहे. इतके सगळे होऊनही आपण सत्याची बाजू घेऊ शकत नसू तर आपल्या देशाचे आणि समाजाचे काही खरे नाही. त्यामुळे क्षुल्लक स्वार्थासाठी आणि हितसंबंध जोपासण्याऐवजी सत्याची बाजू घेणे, त्याबद्दल चर्चा करणे आणि योग्य तो निर्णय घेणे ही काळाची गरज होऊन बसली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com