मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या 9 ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी आज पोलिस, वाहतूक, रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुरक्षेचा आढावा घेत बंद काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता यंत्रणांनी अधिक दक्षता घ्यावी, असे मुख्य सचिवांनी या वेळी सांगितले.
मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात सायंकाळी या संदर्भात आढावा बैठक झाली. बंद काळात संपूर्ण राज्यभरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्याबरोबरच शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील यासाठी प्रयत्न करावेत. एसटी बस सेवा त्याचबरोबर मुंबईत बेस्टची बस सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी पोलिसांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असेही मुख्य सचिवांनी सांगितले.
शाळा- महाविद्यालयांना आवश्यक ती सुरक्षा देतानाच या काळात असलेल्या परीक्षा व्यवस्थित पार पडतील याची काळजी घ्यावी. बंद काळात रेल्वे सेवा सुरू राहील याची दक्षता रेल्वे सुरक्षा दलाने घ्यावी. सर्वच यंत्रणांनी परस्परांशी समन्वय ठेवून बंद काळात आवश्यक त्या सेवांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही मुख्य सचिवांनी या वेळी सांगितले.
|