Death Of Women In kalyan: जळगाव येथे राहणाऱ्या 24 वर्षीय मुलीचा विवाह बापाने मोठ्या थाटात पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या 32 वर्षीय मुलासोबत लावून दिला. मात्र दोन महिन्यातच नवविवाहीत मुलीने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना कल्याण येथे उघडकीस आली आहे.
जागृती बारी असे मृत विवाहीत महिलेचे नाव आहे.पती आणि सासूच्या टोमण्यांना वैतागून मुलीने हे पाऊल उचलले असून तिने मोबाईलमघ्ये तशी नोट लिहून ठेवली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलिस ठाण्यात मुलीचा पती सागर बारी (वय 32) तसेच सासू शोभा बारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने या दोघांना 11 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे सागर हा मुंबईतील आझाद नगर पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहे.
कल्याण मधील आडीवली ढोकळी परिसरात ही धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आली आहे. पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार जळगाव जिल्ह्यातील भूसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे गजानन वराडे यांनी आपली मुलगी जागृती हिचा विवाह जळगावमधील पिंपाळामधील सागर रामलाल बारी याच्या सोबत दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच 20 एप्रिल 2024 ला मोठ्या थाटामाटात लावून दिला होता.
लग्नात वर मुलगा सागरला 14 ग्रॅमची सोन्याची चेन, 6 ग्रॅमची सोन्याची अंगठी देण्यात आली होती. सागर हा मुंबई पोलीस दलात असल्याने विवाहानंतर जागृती ही 21 जूनला कल्याण मधील आडीवली ढोकळी या परिसरामध्ये पतीसह राहायला जाणार असल्याने तिचे आई-वडील पिंप्राळा गावात भेटायला गेले होते.
मृत जागृतीचे आई-वडील भेटायला आले तेव्हा तिची सासू शोभा रामलाल बारी हिने हुंडा दिला नाही, अशी तक्रार केली होती. तसंच मुंबईत घर घेण्यासाठी 10 लाख रुपये द्या, अशी मागणी केल्याचा आरोप वराडे कुटुंबाने केला आहे. सध्या शेतीमध्ये पैसा लागलेला आहे, त्यामुळे पैसे नाहीत. मी तुम्हाला थोडीफार रक्कम देईन, असं आम्ही सांगितलं, त्यानंतर मुलगी मुंबईमध्ये राहायला गेली, असं वराडे कुटुंबाने सांगितले आहे.
मात्र 5 जुलैला जागृतीचा पती सागरने तिचा भाऊ विशालला फोन केला. तुझ्या बहिणीने घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला गळफास घेतला असं मुलीचा भाऊ विशाल याला सांगितलं आणि फोन कट केला. या घटनेमुळं मुलीचे आई वडील आणि काही नातेवाईक कल्याण मध्ये आले. यानंतर मृत जागृतीच्या आईने मानपाडा पोलिसांकडे तक्रार केली.
घर घेण्यासाठी 10 लाखांचा हुंडा मागणं, शारिरिक आणि मानसिक छळ करत असल्याचा गुन्हा पती सागर बारी आणि सासू शोभा बारी यांच्यावर आईच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आमच्या मुलीला टोकाचं पाऊल उचलायला प्रवृत्त करणाऱ्या तिच्या सासू आणि नवऱ्यावर कठोर कारवाई व्हावी, त्यांना शिक्षा मिळाली तर माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल अशी मागणी मृतक मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे.
जागृतीच्या आईने तिच्यासोबत शेवटचं काय बोलणं झालं हे सांगितलं आहे. ‘आई माझी सासू मला तू काळी आहेस, तूझे ओठ काळे आहेत, तोंडाचा घाण वास येतो असे हिणवुन तू माझ्या मुलाला पसंत नाही. घरातून निघून जा. नाहीतर आईकडून घर घेण्यसाठी 10 लाख रुपये घेऊन ये. माझा शारिरिक आणि मानसिक छळ करते, तू त्यांच्याशी बोलून घे’, असं जागृतीने आपल्या आईला फोनद्वारे सांगितले असल्याचे जागृतीच्या आईने सांगितलं आहे.
कल्याण डोंबिवलीत रहायला आल्यानंतर अवघ्या 13 दिवसांमध्येच जागृतीने 5 जुलैला टोकाचं पाऊल उचललं. त्याआधी तिने मोबाईलमध्ये सुसाईट नोट लिहिली. मात्र मोबाईल लॉक असल्यामुळे भाऊ सागरला लॉक ओपन करता आलं नाही. यानंतर पोलिसांनी जागृतीचा मोबाईल ताब्यात घेतला. जागृतीच्या बहिणीने लॉक पॅटर्न सांगितल्यानंतर पोलिसांना नोट सापडली, त्या सुसाईट नोटच्या आधारे मृत जागृतीने सासू आणि पतीला जबाबदार धरत सुसाईड नोट लिहिली आहे. त्याआधारे मानपाडा पोलिसांनी जागृतीचा पती आणि सासू यांच्यावर गुन्हा दाखल करत पुढील कारवाई केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.