सोमवारपासून एसटीच्या 250 जादा बस धावणार; वाचा कोणासाठी आणि कुठे सेवा सुरू होणार

सोमवारपासून एसटीच्या 250 जादा बस धावणार; वाचा कोणासाठी आणि कुठे सेवा सुरू होणार

मुंबई : सोमवारपासून (ता. 8) मंत्रालय व अन्य सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के उपस्थिती अनिवार्य केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी एसटी महामंडळ अतिरिक्त 250 बसगाड्या सोडणार आहे. या बसगाड्या पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, नालासोपारा, वसई, बदलापूर येथून धावणार आहेत.

लाॅकडाऊनमुळे उपनगरी रेल्वे बंद असून, खासगी वाहतुकीला अद्याप परवानगी नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळातर्फे बसगाड्या चालवल्या जात  आहेत. सोमवारपासून आणखी 250 बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यापैकी 142 बस मंत्रालयापर्यंत, तर 15 बस महापालिका भवनापर्यंत धावतील.  उर्वरित सुमारे 100 बसगाड्या मुंबई महानगर प्रदेशात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावणार आहेत.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी 23 मार्चपासून सुमारे 400 बसगाड्या धावत आहेत. या सर्व बस सॅनिटाईझ केल्या जात असून, प्रवासात सोशल डिस्टंन्सिंग नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. डॉक्टर, परिचारिका, सरकारी व मुंबई महापालिकेचे कर्मचारी, सफाई कामगार, पोलिस, अग्निशमन दलाचे कर्मचारी यांच्या वाहतुकीसाठी दररोज 400एसटी बसगाड्यांच्या 800 पेक्षा जास्त फेऱ्या होत आहेत. 

15 हजार कर्मचाऱ्यांची सोय
दररोज सुमारे 15 हजार अत्यावश्यक सेवा कर्मचारी एसटी बसमधून सुरक्षित प्रवास करतात. गरज भासल्यास आणखी बसगाड्यांचे नियोजन केले जाईल, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांनाही ओळखपत्र दाखवून या बसमधून प्रवास करण्याची मुभा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com