ठाण्यातील 'हा' रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा

ठाण्यातील 'हा' रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा

ठाणे : सध्या ठाण्यातील मुंब्रा भागातील  "मुंब्रा बायपास' हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत असून या रस्त्यावर गेल्या वर्षभरात दीडशे जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. वीस वर्षांपूर्वी मुंब्रा शहरातून वाहनाने प्रवास करणे म्हणजे दिव्य होते. येथील एकमेव रस्त्यावरून प्रवास करताना अन्य बाहेरील वाहनांप्रमाणेच स्थानिक वाहनांनाही तासन्‌तास कोंडीत अडकून राहावे लागत होते. या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून महत्त्वाकांक्षी असा डोंगरावरून "मुंब्रा बायपास' रस्ता बांधण्यात आला. पण आजच्या घडीला सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने हा बायपास म्हणजे अपघाताचे केंद्र ठरू लागला आहे. आतापर्यंत गेल्या वर्षभरात या बायपास रस्त्यावरील विविध अपघातात सुमारे दीडशे जणांना जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. 

वाहतूक कोंडीबरोबरच जुना मुंब्रा रस्ता हा अपघातासाठी कुप्रसिद्ध होता. पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे अपघाताला निमंत्रण देत होते. अवजड वाहनांची वर्दळ असल्याने या खड्ड्यांमध्ये ही वाहने शेजारील वाहनांवर कलंडल्याने अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळेच या रस्त्याला पर्यायी म्हणून "मुंब्रा बायपास' रस्ता उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बायपास रस्त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली असली तरी आजच्या घडीला हा बायपास म्हणजे सुरक्षेचे कोणतेही उपाययोजना न केलेला रस्ता ठरला आहे. 

मुंब्रा बायपासवरील अवजड वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वास्तविक, रात्रीच्या वेळेस या मार्गावरून अवजड वाहनांना परवानगी असतानाही दिवसाही ट्रक, ट्रेलर्स आदी वाहने सोडली जातात. त्यामुळे मुंब्रा-कौसा, दिवा, शिळ आदी भागात वाहतूक कोंडी तर होतच आहे. शिवाय, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. मुळात मुंब्रा येथील वाहतूक कोंडी दूर करताना अवजड वाहनांसाठी हा बायपास रस्ता बांधण्यात आला आहे. पण सध्या वाहतूक कोंडीचे वाढते प्रमाण पाहताना किमान दिवसा ठराविक वेळेत या बायपासवरून अवजड वाहनांना प्रवेश देऊ नये, अशी स्थानिकांची मागणी आहे. मात्र ही मागणी मान्य होत नसल्याने एकाचवेळी सर्व वाहने रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. 

अवजड वाहतुकीमागे आर्थिक कारण : जितेंद्र आव्हाड 

बायपास रस्त्यावरील अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून नुकताच आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा झाला आहे. येथून 24 तास होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमागे आर्थिक कारणे आहेत. जर, नियमानुसार दुपारी अवजड वाहने सोडायची आहेत. तर, सकाळी साडेनऊ वाजता हे ट्रक येतातच कसे, ही अवजड वाहने सोडली जातातच कशी? या अपघातांची जबाबदारी पोलिस अधिकारी घेणार का, असे प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केले होते. 

काय आहे स्थिती 

- बायपास रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ 
- रस्त्याच्या कडेला पुरेशा प्रमाणात संरक्षक कठडे बांधण्यात आलेले नाहीत 
- अनेक वेळा मोठी अवजड वाहने थेट डोंगरावरील घरांवर कोसळतात 
- शिळफाटा येथे अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात कोंडी 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com