लॉकडाऊनमध्येही 'शुभमंगल सावधान' जोरात; चार महिन्यांत 556 जोडपी विवाहबद्ध....

लॉकडाऊनमध्येही 'शुभमंगल सावधान' जोरात; चार महिन्यांत 556 जोडपी विवाहबद्ध....



ठाणे : या वर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा फटका लग्न सराईलाही बसला आहे. असे असताना दुसरीकडे दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात जाऊन रजिस्टर पद्धतीने लग्न करणार्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. टाळेबंदीच्या काळात मार्च, मे, जून आणि जुलै या कालावधीत साडेपाचशे जोडपी विवाहबंधनात अडकल्याची माहिती दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

अक्षय्यतृतीय, व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधत अनेक जोडपी विवाहबंधनासारख्या अतूट नात्यात बांधली जात असतात. त्यात लग्नावर होणारा अवाढव्य खर्च वाचवून तो सामाजिक कार्यासाठी अथवा नवविवाहित जोडप्यांच्या पुढील आयुष्यासाठी राखीव ठेवण्याची परंपरा सध्या जोर धरू लागली आहे. त्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात दोन ते तीन महिने आधी नोंदणी करण्यात येत असते. त्यात यंदादेखील मार्च, एप्रिल, मे, जून या लग्नसराईच्या हंगामात दर वर्षी मोठ्या प्रमाणात विवाह होत असतात; मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र टाळेबंदी लागू करण्यात आली.

त्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला; मात्र महिन्याच्या 22 तारखेपासून ते संपूर्ण एप्रिल महिना व मे महिन्यातील 15 दिवस असे सुमारे 50 ते 55 दिवस कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. या कालावधीत अनेक विवाह इच्छुकांसाठी साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीया हा मुहूर्त हुकल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. मार्चच्या 22 तारखेपासून ते संपूर्ण एप्रिल महिना व मे महिन्यातील 15 दिवस असे सुमारे 50 ते 55 दिवस कार्यालय बंद होते.

या कालावधीत अनेक विवाह इच्छुकांचा अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त हुकल्याने हिरमोड झाला आहे. असे असले तरी,मार्च महिन्याच्या 1 मार्च ते 21 मार्चपर्यंत 341 जणांनी विवाह करण्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी 257 जोडपी विवाह बंधनात अडकली आहेत. त्यात 22 मार्चपासून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून टाळेबंदी केली होती. त्यामुळे 23 मार्च ते 14 मेपर्यंत हे कार्यालयदेखील बंद होते. मात्र, मे महिन्यात टाळेबंदीमध्ये शिथिलता आणत निर्बांधात सूट देण्यात आली होती.

त्यात अवघ्या 25 ते 50 माणसांच्या मर्यादेत विवाह समारंभाचे आयोजन करण्यास अनुमती दिली. त्यामुळे पुन्हा मेच्या 15 तारखेपासून विवाह नोंदणी सुरू झाल्याने विवाह इच्छुकांमध्ये आनंदाचे वातवरण असून, त्यांनी विवाह करण्यासाठी आपला मोर्चा दुय्यम निबंधक कार्यालयाकडे वळविला. त्यानुसार मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीत 516 जणांनी विवाहासाठी नोंदणी केली. त्यापैकी 299 जण नात्यात बांधली गेली. त्यामुळे ठाणे शहरात टाळेबंदीत अनेक व्यवहार ठप्प असले तरी दुसरीकडे विवाहाची एक्सप्रेस मात्र सुसाट असल्याचे दिसून येत आहे.


- 1 ते 21 मार्च- 257 जोडपी विवाहबद्ध
- मे, जून, जुलै- 299 जोडपी विवाहबद्ध

-------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com