सांगली, कोल्हापूरनंतर आता हे शहर बुडणार!

भाईंदर ः खाडी किनाऱ्यावरील कांदळवनाची मोठ्या प्रमाणावर झालेली तोड.
भाईंदर ः खाडी किनाऱ्यावरील कांदळवनाची मोठ्या प्रमाणावर झालेली तोड.

भाईंदर ः मेट्रो असो किंवा औरंगाबाद येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी झालेल्या वृक्षतोडीनंतर पर्यावरणाच्या मुद्यावरून रान उठले असताना भाईंदरमध्ये सर्रास कांदळवनाची कत्तल सुरू आहे.

कांदळवनाची तोड करण्यास कायद्याने बंदी असताना, उच्च न्यायालयाचा आदेश असताहीदेखील घोडबंदर आणि भाईंदरमध्ये त्यांची तोड करून मोठ्या प्रमाणात भराव सुरू आहे. यामुळे शहर बुडण्याची शक्‍यता वाढली असून याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.

मिरा-भाईंदरच्या दोन दिशेला खाड्या आणि एका दिशेला समुद्र असून अंतर्गत खाड्यादेखील आहेत. त्यामुळे या परिसरात कांदळवनाचे क्षेत्र मोठे आहे. कांदळवनापासून ५० मीटर क्षेत्रापर्यंत भराव-बांधकामे, तर सोडाच कचरा टाकण्यासदेखील मनाई आहे.

कांदळवन व सीआरझेड पाणथळ परिसर शहराची कवच कुंडले असून भरती वा मोठा पाऊस आल्यास पाणी साठवून ठेवण्याची या क्षेत्राची क्षमता मोठी आणि महत्त्वाची आहे, असे असतानादेखील खासगी आणि सरकारी जागेतील कांदळवनाची मोठ्या प्रमाणात तोड करून त्या क्षेत्रात भराव, बांधकामे केली जात आहेत.

भाईंदर पश्‍चिमेच्या राधा स्वामी सत्संग परिसरात थेट कांदळवनात बेकायदा भराव सुरू आहे. या ठिकाणी कोकण आयुक्तांच्या कांदळवन संरक्षण उपसमितीतर्फे ८ फेब्रुवारी २०१९ ला पाहणी झाली होती. त्यावेळी देखील जागेवरील कांदळवनात व त्यापासून ५० मीटर अंतरापर्यंत भराव आणि कुंपण भिंतीचे बांधकाम आदी झालेले आढळले होते. त्या आधी तहसीलदार अधिक पाटील, मंडळ अधिकारी दीपक अनारे आदींनीदेखील पाहणी केली होती.

या ठिकाणी उच्चतम भरती रेषेच्या तसेच कांदळवनापासून ५० मीटर अंतरात देखील भराव सुरू आहे. बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत. आरएमसी प्रकल्पातून निघणारे सिमेंट आदींचे घातक सांडपाणी बेकायदेशीरपणे थेट कांदळवनात सोडले जात आहे. याबाबत झालेल्या तक्रारीनंतर मंडळ अधिकारी दीपक अनारे, तलाठी अभिजित बोडके आदींनी घटनास्थळाची पाहणी केली; परंतु कारवाई मात्र शून्य असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

कारवाईची मागणी  
कांदळवनांची तोड करून त्यावर भराव, बांधकामे करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून बेकायदा भराव काढून टाका. येथील बांधकामे हटवा. तसेच कांदळवनाची लागवड करून भरतीच्या पाण्याचा प्रवाह मोकळा करा, अशी मागणी वनशक्तीचे स्टॅलीन दयानंद यांच्यासह रुपाली श्रीवास्तव, प्रदीप जंगम, इरबा कोनापुरे आदींनी केली आहे. डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

कांदळवन ऱ्हासाचे सर्वात जास्त गुन्हे 
कांदळवनांवर झालेल्या बांधकामांना वीजपुरवठा, कर आकारणी, पाणी तसेच गटार, शौचालय, रस्ते आदी सर्व सुविधा पुरवल्या जात असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास वाढत आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने, तर कांदळवनाचे गुन्हे दाखल असूनदेखील बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. कांदळवन ऱ्हासाचे सर्वात जास्त गुन्हे शहरात दाखल आहेत, तरी देखील कांदळवनाची कत्तल आणि भराव सुरूच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com