अवजड वाहनांमुळे महाडमधील रस्त्यांची चाळण

महाड : ग्रामीण भागातील रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत आहे.
महाड : ग्रामीण भागातील रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत आहे.

महाड (बातमीदार) : ग्रामीण भागातून दिवसेंदिवस वाढत चाललेली रेती आणि मातीची अवजड वाहतूक; तसेच वाढलेली दळणवळणाची साधने यामुळे ग्रामीण भागातील रस्ते उखडून गेले आहेत. सातत्याने दुरुस्ती केली जात असली, तरी क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहने या रस्त्यांवरून धावत असल्याने रस्त्यांची पुरती चाळण उडाली आहे. 

बहुतांश गावात जाणारे रस्ते हे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्ते आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे आधीच अपुरा निधी असल्याने वर्षानुवर्ष केवळ खड्डे भरण्यापलीकडे कामे केली जात नाहीत. मुळातच हे रस्ते किमान आठ टन क्षमतेचे बनवलेले आहेत. त्यातच ग्रामीण भागात केवळ एस.टी. बस आणि ट्रकसारखी वाहने अल्प प्रमाणात ये-जा करत असतात. यामुळे हे रस्ते काही वर्षांपूर्वी सुस्थितीत राहत होते; मात्र बदलत्या काळानुसार रस्त्यांची संख्या, वाहनांची संख्या आणि ग्रामीण भागातील दळणवळण वाढले. यामुळे रस्ते सातत्याने खड्डेमय बनू लागले आहेत. त्यातच अनेक गावांतील जमीन खरेदी-विक्रीमुळे जमीन सपाटीकरण यंत्रणाही ये-जा करू लागली आहे. त्यातून निघणारी माती देखील अवजड वाहनांतून नेली जाते. शिवाय, रेती वाहतूकही मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याने पुरती वाट लागली आहे. यातील अनेक रस्त्यांवर गेल्या अनेक वर्षांत दुरुस्ती झालेली नाही. यामुळे ऐन पावसाळ्यात एस. टी. बस सुविधाही बंद पडते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. 

या रस्त्यांवरच आता महसूल विभागाकडून अनेक गावांत माती उत्खननास परवानगी दिली जाते. जवळपास २० टन क्षमतेच्या वाहनातून ही माती शहरात किंवा विविध सरकारी प्रकल्पांना आणली जात आहे. यामुळे रस्त्यांवरील खडी आणखीच सुटी होऊन रस्त्याची धूळधाण होत आहे. महाड तालुक्‍यात सध्या मुंबई-गोवा चौपदरीकरण कामाला मोठ्या प्रमाणावर माती लागत आहे. ही माती ग्रामीण भागातून आणली जाते. यासाठी अवजड वाहने वापरली जात आहेत. काही ठिकाणी या चौपदरीकरण नावाखाली माती वाहतूक करून प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. अशा अवैध उत्खनन आणि वाहतूक यामुळे हे रस्ते नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. महाडजवळ महाड गोंडाळे, महाड नांदवी, महाड वाळण, तसेच महाड खाडीपट्टा विभागातील अनेक गावांतून वाळू आणि माती वाहतूक सुरू असल्याने या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

ग्रामीण भागातील रस्ते हे कमी क्षमतेचे आहेत; मात्र आता अवजड वाहने गावागावात जाऊ लागली आहेत. यामुळे भविष्याचा विचार करता तसे रस्ते करणे आवश्‍यक आहे. शिवाय, महसूल प्रशासनाने परवानगी देताना रस्त्यांच्या क्षमतेचाही विचार केला पाहिजे.
- सतीश जगताप, कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग, रायगड जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com