बर्ड फ्लूचा फटका पोल्ट्री उद्योगाला, कोट्यवधीचं नुकसान

बर्ड फ्लूचा फटका पोल्ट्री उद्योगाला, कोट्यवधीचं नुकसान

मुंबई: कोरोनानंतर आलेल्या बर्ड फ्लूच्या संकटामुळे राज्यातील पोल्ट्री उद्योग पुन्हा एकदा संकटात सापडलाय. बर्ड फ्लूच्या संकटामुळे केवळ गेल्या एका महिन्यात पोल्ट्री उद्योगाचं हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालं असून पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांसह पोल्ट्री उद्योगावर अवलंबून असलेले अन्य लहान-मोठे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

शेतीपूरक उद्योग म्हणून राज्यभरात मोठ्या प्रमाणात पसरलेला पोल्ट्री उद्योग सध्या मोठ्या संकटातून जात आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात मागील महिनाभरापासून बर्ड फ्लूचं थैमान सुरू असून अनेक ठिकाणी लाखो कुक्कुटपक्षांना नष्ट करावे लागत आहे. तर बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर बाजारात चिकन आणि अंड्यांची मागणी घटल्यानं चिकन आणि अंड्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरलेत. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाला मागील एका महिन्यात तब्बल 1600 कोटी रुपयांचा फटका बसला असल्याचे पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशन सचिव उद्धव अहिरे यांनी सांगितले.

पोल्ट्रीतील प्रति कुक्कुट पक्षाची उत्पादन किंमत 70 रुपये आहे. बर्ड फ्लूमुळे शेतकऱ्याला गेल्या महिनाभरापासून 55 रुपये प्रति पक्षी विक्री करण्याची वेळ आली आहे. एका पक्षामागे 15 रुपयांचं नुकसान सोसावे लागत आहे. वजनानुसार 2 किलोच्या एका पक्षामागे शेतकऱ्यांना 30 रुपयांचं नुकसान होत आहे. 

अंड्याच्या उत्पादन आणि विक्रीत ही शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अंड्याचा उत्पादन खर्च प्रति अंडे 4 रुपये इतका येतो. बर्ड फ्लूमुळे सध्या 3 रुपये दराने अंड्याची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे
मागील एका महिन्यापासून प्रति अंडे 1 रुपयांचं नुकसान होत आहे.

मागील महिनाभरात राज्यात 4 कोटी कोंबड्यांची विक्री झाली. यामध्ये पोल्ट्री उत्पादकांना तब्बल 1200 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं तर अंडी विक्रीतही जवळपास 400 कोटी रुपयांचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला आहे. मागील वर्षी कोरोना संकटाच्या काळातही पोल्ट्री व्यवसायाला 3000 कोटींचा तोटा सहन करावा लागला होता. या संकटातून पोल्ट्री व्यावसायिक हळूहळू सावरत असतानाचं बर्ड फ्लूच्या संकटानं पोल्ट्री व्यवसायाला पुन्हा एकदा उध्वस्त केलं. 

भारतात 2006 सालापासून आत्तापर्यंत 28 वेळा पोल्ट्री व्यवसायावर बर्ड फ्लूचं संकट आलं. मात्र या संकटातून सावरत शेतीला पूरक व्यवसाय म्हणून नावारूपाला आलेल्या पोल्ट्री व्यवसायाची राज्यातली उलाढाल 15 हजार कोटींच्या घरात आहे. मात्र आधी कोरोना आणि आता बर्ड फ्लूच्या आक्रमणामुळे वर्षभरातचं पोल्ट्री व्यवसायाला साडे चार ते पाच हजार कोटींचा फटका बसलाय. तर पोल्ट्रीशी निगडित असलेल्या मक्याची मागणीही घटल्यानं मक्याचे दर 1400 रुपये प्रति क्विंटल वरून 1250 प्रति क्विंटलपर्यंत खाली आल्यानं पोल्ट्री उत्पादकांसह मका उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडले आहेत. 

बर्ड फ्लूसाठी होकारार्थी आढळून आलेल्या, पोल्ट्री फार्मपासून 1 किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी अंडी, कुक्कुट खाद्य आणि विष्टा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून 1,37,305 कुक्कुट पक्षी, 44686 अंडी आणि 63864 किलो खाद्य नष्ट करण्यात आले आहे. तर  राज्य शासनाद्वारे नष्ट करण्यात आलेल्या पक्ष्यांच्या मालकांना आजतागायत रु.34.06 लक्ष अनुदान वाटप करण्यात आले आहे.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bird flu maharashtra struggling crores rupees were lost

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com