मुंबई: राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची संख्या वाढत असून त्यांचा आक्रोश सरकारच्या कानावर जात नाही. या आंदोलनाने सरकारचे डोळे उघडले नाहीत तर यापुढे राज्यातील मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या जातील, असा इशारा भाजपच्या राज्य उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिला.
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात सोमवारी भाजपतर्फे दादर चौपाटी परिसरात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी हा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात खासदार गोपाळ शेट्टी, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आशीष शेलार, पराग अळवणी, कालिदास कोळंबकर, मनीषा चौधरी, सुनील राणे, तमिळ सेल्वन सहभागी झाले होते.
आज सत्तेत बसलेल्या पक्षांनी आपल्या निवडणूक जाहिरनाम्यात महिला सुरक्षेचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यावर त्यांना महिलांचे प्रश्न महत्वाचे वाटत नाहीत. आता त्यांना महिलांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत याची लाज वाटली पाहिजे. राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत सरकारमधील नेते काहीही बोलत नसले तरी आम्ही या महिलांच्या व्यथा मांडतच राहू, असेही वाघ म्हणाल्या.
हाथरस बलात्कार प्रकरणानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून कारवाई केली, महिला सुरक्षेसंदर्भात त्यांनी एसओपी जाहीर केली. त्यानुसार बलात्कार प्रकरणाचा तपास दोन महिन्यांत पूर्ण होईल, पोलिस ठाण्यात महिलांची तक्रार नोंदवून न घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई होईल. मात्र कोविड सेंटरमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात अजूनही राज्य सरकारने एसओपी दिली नाही. राज्यात असा प्रसंग घडलाच तर त्या महिलेच्या मागे आपण सर्वांनी उभे रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. या आंदोलनाने सरकारचे डोळे उघडले नाही तर यापुढे राज्यातील मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या जातील, असाही इशारा त्यांनी दिला.
-----------------------
(संपादन- पूजा विचारे)
BJP agitation women safety chitra wagh dadar mumbai
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.