ठाण्यात मालमत्ता करावरून भाजप-मनसे आक्रमक; सत्ताधारी शिवसेनेची कोंडी

ठाण्यात मालमत्ता करावरून भाजप-मनसे आक्रमक; सत्ताधारी शिवसेनेची कोंडी


ठाणे : शहरातील 500 चौरस फूटापर्यंत घराचा मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भात शिवसेनेने महापालिका निवडणुकीच्या वेळी घोषणेची, भाजपाने बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेला आठवण करुन दिली आहे. तर मनसेने थाळीनाद आंदोलन करुन ही मालमत्ता कराची माफी कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित केला आहे. मालमत्ता कराच्या माफीवरुन भाजपा आणि मनसेने आता सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडले आहे.

शहरातील विविध भागात भाजपाने `क्या हुआ तेरा वादा' असा बॅनरद्वारे सवाल करीत मालमत्ता करमाफीवरून शिवसेनेने सुरू केलेल्या टाळाटाळीकडे ठाणेकरांचे लक्ष वेधले आहे. कोरोनाच्या आपत्तीत सापडलेल्या लाखो ठाणेकर कुटूंबांना मालमत्ता कर व पाणीपट्टीतून दिलासा देण्यास ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने नकार दिला आहे. महापालिकेचे उत्पन्न घटणार असल्याचे कारण दाखवून, शिवसेनेच्या नेत्यांकडून सातत्याने टाळाटाळ केली जात आहे. मात्र,2017  मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने जाहीर केलेल्या वचननाम्यात 500 चौरस फूटांपर्यंत घरांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आता सत्ता मिळाल्यानंतर वचननाम्याचा सोयिस्कर विसर पडून मालमत्ता कर माफ करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, याकडे भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले यांनी लक्ष वेधले आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका मुख्यालयाच्या बाहेर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. मनसेच्या या आंदोलनाससाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती त्यामुळे आंदोलनाच्या  ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

2012 च्या वचननाम्याचाही पंचनामा करणार 
आज केवळ थाळीनाद आंदोलन करण्यात आले आहे. करमाफीचे 2017 च्या निवडणुकीत दिलेले वचन कुठे गेले ?टोल मुक्ती का झाली नाही ? घनकचरा करात व्यापाऱ्यांना करसवलत का देण्यात आली नाही . यापुढे जोपर्यंत दिलेले वचन शिवसेना पूर्ण करणार नाही तोपर्यंत नवीन वचन देऊन नये अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल . तसेच या पुढे आम्ही सत्तधारी शिवसेनेच्या 2012 च्या वचनाम्याचाही पंचनामा करणार असल्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. त्याचवेळी महापालिकेत 24 नगरसेवकांचे बळ असताना भाजपाचे नेते या विषयावर केवळ बॅनरबाजी करुन का स्वस्थ बसत आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

करमाफीच्या मुद्द्यावरून भाजप चळवळ उभारणार  
ठाण्यात शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना असे बोलले जाते. मात्र कोणत्याही आश्वासनाची पूर्तता शिवसेनेकडून होत नाही. निवडणुकीत 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना अजूनही करमाफी देण्यात आलेली नाही. नागरिकांची मते घेतली आणि आता त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत . याविरोधात भाजपच्या वतीने चळवळ उभी केली जाणार आहे.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com