
ओबीसी आरक्षणामुळे BMC च्या निवडणुका लांबल्या; इच्छूकांचा खिसा हलका
मुंबई : कोविडनंतर (corona) आता ओबीसी आरक्षणामुळे (obc reservation) मुंबई महापालिकेच्या निवडणुका (bmc election) लांबल्या आहेत. साहजिकच इच्छुकांना आपल्या प्रभागात जम बसवण्याची संधी मिळाली आहे; मात्र, तीच आता त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. रोजच्या रोज घरासमोर वर्गणीदारांच्या रांगा (Money contribution) लागत असून हा भार कधीपर्यंत सोसावा लागेल, याची चिंता इच्छुकांना सतावू लागली आहे.
हेही वाचा: बदलापूर-अंबरनाथ : घरांचे प्रती चौ.फु मागे वाढले ५०० रुपये! शहराला महागाईच्या झळा
महापालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी साधारण फेब्रुवारी महिन्यात होतात. त्याआधी वर्ष-दीड वर्षांपासूनच परिसरातील दोन-तीन प्रभागांत मोर्चेबांधणी सुरू होते. विद्यमान नगरसेवकांचे काम पाच वर्षांपासून सुरू असते. निवडणुकीच्या वर्षभर आधी ते आजूबाजूच्या दोन-तीन प्रभागांत संपर्क वाढवण्यावर भर देतात. मात्र, यंदा सुरुवातीला कोविडमुळे निवडणुका लांबणीवर जाणार, हे निश्चितच होते.
त्यातच आता ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे ती कधी होईल, याची शाश्वती नाही. निवडणूक कधी होईल, याचा नेम नसला तरीही कार्यालयात रोजच वर्गणीदारांची रांग लागत आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांसह इच्छुकांचा खिसा रोजच हलका होत आहे. ही परिस्थिती कधीपर्यंत राहणार हे निश्चित नसल्याने आता खिसा हलका होत आहे, तर पुढील काही महिन्यांत तिजोरीही रिकामी करावी लागेल, अशी भीती काही माजी नगरसेवक व्यक्त करत आहेत.
हेही वाचा: लोकअदालतीमध्ये 7 लाखांहून अधिक प्रकरणं काढली निकाली
इच्छुकांना तर अधिकचा भार
माजी नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात पाच वर्षांत कामे केली आहेत. त्या कामांचा प्रभाव आजूबाजूच्या प्रभागांवर निश्चित पडतो. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होऊ शकतो. मात्र, पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत असलेल्या इच्छुकांना सुरुवातीला आपला चेहरा मतदारांपर्यंत पोहचवावा लागतो. त्यासाठी त्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसते.
निवडणुकीच्या दोन-अडीच वर्षे आधीपासूनच इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू होते. त्यांना मंडळे, बचत गट आणि सोसायट्यांसाठी ‘खर्च’ करावा लागतो. आतापर्यंत त्यांनी तो केला. आता निवडणुका लांबणीवर पडल्याने यापुढेही त्यांना असा खर्च करावा लागणार असल्याने त्यांच्यापुढे पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.
आता येणार खर्चाचा मोसम
सुट्ट्यांचा मोसम येत असल्याने आता ‘भव्य क्रीडा’ स्पर्धा होणार आहेत. अशा स्पर्धांना प्रायोजक म्हणून इच्छुकांना खिसा हलका करावा लागेल. त्याचबरोबर चाकरमान्यांच्या कुटुंबांना गावी जाण्यासाठी माफत दरात बससेवाही उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. येत्या काही दिवसांत होणाऱ्या होळी आणि धुळवडीपासूनच अशा खर्चाची सुरुवात होणार आहे.
Web Title: Bmc Election Postponed Due To Obc Reservation Issue After Corona Pandemic Mumbai Election Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..