दादरमधल्या चैत्यभूमीचा होणार कायापालट, मुंबई पालिका करणार सुशोभीकरण

दादरमधल्या चैत्यभूमीचा होणार कायापालट, मुंबई पालिका करणार सुशोभीकरण

मुंबईः भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असलेल्या दादर येथील चैत्यभूमीची दुरुस्ती आणि सुशोभीकरण महानगर पालिका करणार आहे. चैत्यभूमीची देखभालीसाठी महानगर पालिकेकडे 28 कोटी रुपये जमा असून त्यातून ही दुरुस्ती करुन घ्यावी, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी  प्रशासनाला दिले. मागील 18 वर्षांपासून राज्य सरकारकडून नियमितपणे राज्य सरकारकडून पालिकेला चैत्यभूमीच्या देखभालीसाठी निधी येत आहे. हा निधी खर्च झालेला नाही.

दादर येथील चैत्यभूमीची डागडुची राज्य सरकारने करावी असे पत्र सप्टेंबर महिन्यात महानगर पालिकेने सरकारला पाठवले होते. यावरुन बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करुन महापालिकेनेच चैत्यभूमीचा डागडुजी तसेच सुशोभीकरण महानगर पालिकेने करणे गरजेचे आहे. 

चैत्यभूमीच्या पूर्नबांधणीसाठी महानगर पालिकेने वर्षभरापूर्वी वास्तुविषारदाची नियुक्ती केली होती. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शेजारील इंदू मिलमध्ये स्मारक होत असताना चैत्यभूमीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.त्यामुळे दुरुस्ती आणि सुशोभीकरणाची जबाबदारी महापालिकेने घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली. चैत्यभुमीसाठी पालिकेकडे 29 कोटी रुपयांचा निधी आहे.त्या निधींचा वापर करुन तत्काळ दुरुस्ती बाबत निर्णय घ्यावा.तसेच याबाबत पुढील बैठकीत माहिती सादर करावी असे निर्देश अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार या ठिकाणी झाले होते. तेथे त्यांच्या अस्थी जतन करण्यात आल्या आहेत. दरवर्षी 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाला येथे आंबेडकरी अनुयायी लाखोंच्या संख्येनंही अभिवादन करण्यासाठी येतात. राज्य सरकारकडून 2002 पासून चैत्यभुमीच्या देखभालीसह डागडूजी आणि सुशोभीकरणासाठी पालिकेला निधी मिळत आहे. हा निधी अद्याप खर्च झालेला नाही. या खर्चातून डागडुजी आणि सुशोभीकरण करता येईल असेही जाधव यांनी सांगितले.

समुद्र किनाऱ्यांचं सुशोभीकरण

पालिका दादर चैत्यभूमी ते प्रभादेवी पर्यंतच्या समुद्र किनाऱ्यांचे सुशोभीकरण करणार आहे. या सुशोभीकरणात शोभीवंत दिवे तसेच झाडे लावण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी हा किनारा आकर्षण ठरेलच. प्रभादेवी पासून माहिमपर्यंतचा समुद्र किनारा गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्षित झाला आहे.

समुद्राच्या आक्रमणामुळे प्रभादेवीपासून दादरपर्यंतचा किनारा नामशेष झाला होता. मात्र गेल्या काही वर्षात पालिकेनं विविध उपाय करुन दादरची चौपाटी पुन्हा जिवंत केली आहे. माहिमच्या किनाऱ्यावरही आता सुरुचे वन खुलवण्यात येत आहे. त्याचबरोबर पुढच्या टप्प्यात आता महानगर पालिकेने आता चैत्या भूमीपासून प्रभादेवीपर्यंतच्या समुद्र किनाऱ्यांचे सुशोभीकरणाचा निर्णय घेतला आहे. या सुशोभीकरणाला स्थायी समितीने काही दिवसांपूर्वी मंजूरी दिली आहे. समुद्र किनारा हा मुंबईची ओळख आहे. या किनाऱ्याला पुन्हा जुनी ओळख मिळवून देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

दादर चौपाटीवरुन वाळूतून पूर्वी थेट प्रभादेवी पर्यंत चालत जाता येत होते. घोड्यांचे रपेटही घेता येत होती. भेळपुरी पाणी पुरीची लज्जतही चाखता येत होती. मात्र 90 च्या दशकानंतर समुद्राच्या आक्रमणामुळे किनाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर काही वर्षांपूर्वी पालिकेने दादरच्या किनारा पुन्हा जिवंत केला.

दादर किनाऱ्यावर डेकही

दादरच्या किनाऱ्यावर जुनी पर्जन्य वाहिनी आहे. या वाहिनीवर आता व्हिव्हींग डेक बनवण्याचा पालिकेचा विचार आहे. यासाठी पालिकेनं महाराष्ट्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाशी प्राथमिक चर्चा करुन त्यांना प्रस्तावही पाठवला आहे. याबाबतही सादरीकरणही झाले आहे. जुन्या गिरण्यांमधील पावसाचे पाणी या पर्जन्य वाहिनीतून समुद्रात सोडले जायचे होते. मात्र आता ही पर्जन्यवाहिनी फारशी वापरली जात नाही. त्यामुळे त्यावर डेक बनवून पर्यटकांसाठी नवे आकर्षण खुले करण्याचा पालिकेचा विचार आहे.
--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

BMC will repair Dadar Chaityabhoomi Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com