
मुंबईच्या शहर भागात ब्रिटीशांनी नियोजनबध्द पर्जन्य जलवाहिन्याचे जाळे तयार केले आहे.
Mumbai News : मुंबईतील ब्रिटीशकालिन पर्जन्य जलवाहिन्यांची होणार पूनर्बांधणी
मुंबई - मुंबईच्या शहर भागात ब्रिटीशांनी नियोजनबध्द पर्जन्य जलवाहिन्याचे जाळे तयार केले आहे. हे जाळे जीर्ण झाल्याने त्याची काही ठिकाणी पडझड झाली असल्याने त्या वाहिन्यांची पूनर्बांधणी करण्याचे मोठे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने दिली. ही कामे पूर्ण होताच पावसाचे पाणी भरण्याची शहर भागातील ठिकाणे कमी होतील असा विश्वास या खात्यातील अधिकारी व्यक्त करीत आहेत.
शहर भागातील ३२ किलोमीटर इतक्या लांबीच्या कमानीच्या आकाराच्या पर्जन्य वाहिन्यांचे मुल्यांकन पालिकेने केले आहे. त्यापैकी सुमारे १४.२८ किलोमीटर इतक्या लांबीच्या २७ कमानी वाहिन्या नव्याने टाकण्यात येणार आहेत. तसेच ८०० किलोमीटर लांबीच्या तीन कमानींची पूनर्बांधणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पर्जन्य जलवाहिन्या विभागाने दिली.
जमीनीखालील या पर्जन्य जलवाहिन्यांची पडझड झाल्याने त्यातून पावसाळी पाण्याचा निचरा होण्यात अडथळे येत आहेत. परिणामी पावसाळ्यात शहराच्या काही भागात पाणी तुंबत होते. ही कामे मोठी असून पावसाळा तीन महिन्यांवर आला आहे. त्यामुळे जमीनीखालील या वाहिन्या बदलण्याच्या कामाला पावसाळ्यानंतर वेग येईल, अशी माहिती या विभागाने दिली. ही कामे पूर्ण होताच पावसाच्या पाण्याचा निचरा होईल तसेच पावसाचे पाणी भरण्याची ठिकाणेही कमी होतील असा विश्वास या खात्यातील अधिका-यांनी व्यक्त केला आहे.