'सीबीआय'च्या अधिकाऱ्यांना व्हावे लागणार १४ दिवस क्वारंटाईन; BMC ने केले महत्वपुर्ण ट्विट

'सीबीआय'च्या अधिकाऱ्यांना व्हावे लागणार १४ दिवस क्वारंटाईन; BMC ने केले महत्वपुर्ण ट्विट



मुंबई : मुंबईत शासकीय कामासाठी परराज्यातून येणाऱ्या अधिकाऱ्यांना पुर्वपरवानगीशिवाय क्वांरटाईऩच्या नियमातून सूट मिळणार नाही, असे महापालिकेने आज स्पष्ट केले. नियमानूसार परराज्यातून येणाऱ्या विमान प्रवाशांना मुंबईत 14 दिवस होम क्वांरटाईन बंधनकारक आहे. यातून सुट मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी मुंबईत येण्यापुर्वी किमान दोन दिवस आधी महापालिकेकडे इमेलवरुन अर्ज करावा, अशी सुचना पालिकेच्या अधिकृत ट्वीटर हॅन्डलवरुन आज जाहीर करण्यात आली. 

मात्र, या निर्णयामुळे आता वाद पेटण्याची शक्यता आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास केंद्राने सीबीआयकडे सोपवला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्लीतून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक मुंबईत येण्याची शक्यता आहे. मात्र, या पथकालाही आता अर्ज करुनच क्वारंटाईनमधून सुट मिळवावी लागणार आहे. त्यामुळे बिहार पोलिस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याचा वाद शमला नसतानाच त्यात आणखी भर पडली आहे. 

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसांचे पथक मुंबईत आले होते. पथकाने मुंबईत काही जणांच्या जबान्याही घेतल्या. त्यानंतर 2 ऑगस्टरोजी पटणा येथील पोलिस अधिक्षक विनय तिवारी मुंबईत दाखल झाले. ते गोरेगाव येथील राज्य राखीव दलाच्या विश्रामगृहात पोहचल्यानंतर पालिकेच्या पथकाने त्यांना होम क्वारंटाईन राहाण्याची शिफारस करुन त्यांच्या हातावर शिक्काही मारला. यानंतर बिहार पोलिसांनी पालिकेकडे अर्ज करुन तिवारी यांना सुट देण्याची विनंती केली होती. मात्र, पालिकेने यास नकार दिला होता. 

या प्रकरणानंतर पालिका प्रशासनाने 3 ऑगस्ट रोजी विमानतळावर तैनात असलेल्या वैद्यकिय पथकाला पत्र पाठवले. विमानाने परराज्यातून मुंबईत येणारेे काही अधिकारी पालिकेच्या पथकाला सरकारी ओळखपत्र दाखवून होम क्वारंटाईनपासून सुट मिळवत आहेत. मात्र, विमानतळावरील वैद्यकिय पथकाने परस्पर सुट देऊ नये, असे स्पष्ट निर्देश या पत्रात अतिरीक्त आयुक्त पी वेलारसू यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले आहेत. 

बिहारचे पथक पुन्हा येण्याची शक्यता
महापालिकेने विमानतळावरील वैद्यकिय अधिकाऱ्यांना दिलेले हे पक्ष आज ट्वीटरद्वारे जाहीर केले. कोव्हिड साथीच्या पार्श्वभुमीवर  केंद्र व राज्य सरकारची नियमावली तसेच, 25 मे रोजीचे राज्य सरकारचे निर्णय, यानूसार हि कार्यवाही करण्यात येत असल्याचे पालिकने स्पष्ट केले आहे. सुशांतसिंह प्रकरणात सीबीआय चौकशी करणार आहे. त्यामुळे केंद्रीय पथक तसेच बिहार पोलिसांचेही पथक पुन्हा मुंबईत येण्याची शक्यता आहे.

----------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com