वेळीच सावध व्हा! बदलती जीवनशैली ठरतेय कर्करोगाला कारणीभूत

वेळीच सावध व्हा! बदलती जीवनशैली ठरतेय कर्करोगाला कारणीभूत

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांचे कॅन्सरने निधन झाले. वाढते नागरीकरण आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे सर्वच प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कॅन्सरमुळे मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.

कॅन्सरचे दोनशेहून अधिक प्रकार आढळता. कॅन्सर कोणत्याही पेशीत, कोणत्याही उतीमध्ये आणि अवयवांमध्ये होऊ शकतो. पेशींची अनिर्बंध वाढ हे सर्व प्रकारच्या कर्करोगातील साम्य आहे. पेशींचे विभाजन क्रमाक्रमाने व नियंत्रित पद्धतीने होते. शरीराच्या आवश्यकतेनुसार नव्या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. परंतु, कधीकधी पेशींचे विभाजन नव्या पेशींची आवश्यकता नसताना होत राहते. या अतिरिक्त पेशींच्या गाठोड्यांना ट्युमर म्हणून ओळखले जाते.

वाढते नागरीकरण हेही वाढत्या कर्करोगाचे एक कारण आहे. कर्करुग्णांचे प्रमाण ग्रामीण भागात एक लाख व्यक्तींमागे 40 ते 50 , नगरांमध्ये 70 आणि शहरांमध्ये 90 ते 100 आहे. वाढते शहरीकरण, वाढते वय, प्रदूषण आणि बदललेला आहार ही कॅन्सरच्या वाढीची कारणे असल्याचे टाटा मेमोरियल कॅन्सर सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले. शहरीकरणाच्या वाढीबरोबर कॅन्सरचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे, असा इशाराही त्यांनी दिला. 

धूम्रपानाची सवय, धूम्रपान करणाऱ्यांचा सहवास, वायुप्रदूषण, निकृष्ट आहार अशा कारणांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: बदललेल्या लाईफस्टाईलमुळे  फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याचे आढळते. फुफ्फुसाचा कॅन्सर जगात मृत्यूचे एक प्रमुख कारण ठरत असल्याचे समोर आले आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात प्रदूषणाची पातळी वाढतच आहे. वाहनांची संख्या वाढत असल्याने हवेतील प्रदूषक घटकांचे प्रमाण वाढत आहे. कारखान्यांतून  निघणाऱ्या विषारी वायूचे आरोग्यावर दुष्परिणाम होत असतात. त्यामुळे जीवनशैली सुधारण्यावर भर देण्याची गरज असल्याचे डॉक्टर सांगतात.

फुफ्फुसाचा कर्करोग 
कर्करोग पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात लक्षात आल्यास उपचार यशस्वी होतात. फुफ्फुसाचा कर्करोग तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात लक्षात येतो. त्यामुळे उपचार करणे कठीण होते. फुफ्फुसाच्या कर्करोगावरील उपचारही महागडे असतात. त्यामुळे तुलनेने मृत्यूची संख्या अधिक असते, असे कर्करोग तज्ज्ञ डॉ. विनय देशमाने यांनी सांगितले. फुफ्फुसाचा कर्करोग आणि क्षयरोगाची लक्षणे बहुश: सारखी असतात. एक्‍स-रे किंवा सीटी स्कॅनमध्येही पहिल्या टप्प्यात कर्करोग लक्षात येत नाही. त्यामुळे सुरवातील क्षयरोग व इतर आजाराचे उपचार होण्याचे प्रकार घडतात. परिणामी फुफ्फुसाच्या कर्करोगाचे बळी जास्त असल्याची शक्‍यता डॉक्‍टरांकडून व्यक्त केली जाते. 

मुंबईत रोज दोन बळी
फुफ्फुसाच्या कर्करोग शेवटच्या टप्प्यात समजत असल्याने उपचार करणे अवघड होते. मुंबईत कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. शहरात दिवसाला सरासरी दोन जणांचा मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगाने होतो. मुंबईत फुफ्फुसाच्या कर्करोगाने 2014 मध्ये 831 जणांचा (526 पुरुष व 305 महिला), 2015 मध्ये 694 जणांचा (443 पुरुष व 251 महिला) बळी घेतला. कॅन्सरने झालेल्या मृत्यूंमधील फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण 2014 मध्ये प्रमाण 13.9 टक्के, तर 2015 मध्ये 12.8 टक्के होते. देशभरात 2018 मध्ये कर्करोगामुळे 45 हजार 363 जणांनी जीव गमावला.

मोठ्या व्यक्तींचा मृत्यू
कॅन्सरने अनेक सेलिब्रिटी व राजकीय नेत्यांचा बळी घेतला आहे. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, अभिनेते राजेश खन्ना, विनोद खन्ना आणि आता ऋषी कपूर व इरफान खान यांचा कॅन्सरने मृत्यू झाला. मोठ्या व्यक्तींच्या मृत्यूमुळे कॅन्सरबाबत चर्चा होते. त्यामुळे कर्करोगाबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहोचते आणि काही प्रमाणात जनजागृती होते. आर. आर. पाटील यांचे कॅन्सरने निधन झाल्यानंतर अनेकांनी तंबाखू सेवनाचा त्याग केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com