सीएएविरोधातील नाट्य सादर केल्याने चौथीतल्या मुलांवर देशद्रोहाचा गुन्हा! 

caa
caa

मुंबई : ज्या मुलांना स्वतःचे कपडे नीट घालता येत नाहीत, अशी मुले देशद्रोहाचा गुन्हा काय आणि कसा करणार? त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून सरकार काय साध्य करणार?.. हा उद्विग्न सवाल आहे अखिल भारतीय मराठी नाट्य-संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांचा. 

शाळकरी मुलांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे हे कार्य केले आहे कर्नाटकातील बिदर येथील पोलिसांनी. तेथील एका उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चौथीतील विद्यार्थ्यांचे एक नाटुकले सादर करण्यात आले होते. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या संदर्भातील त्या नाटिकेत, एका पात्राच्या तोंडी पंतप्रधानांची प्रतिमाहनन करणारा संवाद होता. त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी तातडीने त्यावर कारवाई केली. त्या चौथीतील मुलांची चौकशी करून त्यांच्याविरोधात त्यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या या कृत्यामुळे समाजमाध्यमांतील अनेकांची हसावे की रडावे अशी स्थिती झाली असून, त्याविषयी नाना प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असतानाच, मराठी नाट्यक्षेत्रातूनही याबाबत निषेधाचे सूर उमटू लागले आहेत. 

यासंदर्भात ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की देशातील प्रत्येक नागरिकाला आपले विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन असता कामा नये. देशात आजही संविधानच लागू आहे. अद्याप तरी हुकूमशाही आलेली नाही. तेव्हा विचार व्यक्त करण्यावर बंदी घालता येणार नाही, असा तिरकस टोलाही त्यांनी लगावला. आज बिदर येथे ही घटना घडली. उद्या ती आपल्याकडेही घडू शकते. आणि म्हणूनच विचारस्वातंत्र्यावर बंधन घालणाऱ्या वृत्तीचा निषेध केला पाहिजे, असे गज्वी म्हणाले. 

व्यक्त होण्याच्या माध्यमांवर सरकारने अशाप्रकारे गदा आणणे लोकशाहीला घातक असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते प्रदीप कबरे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, "सीएए'बाबत माझे मत वेगळे आहे; परंतु "सीएए'ला विरोध करणाऱ्यांची अशाप्रकारे मुस्कटदाबी करणे अयोग्य आहे. चौथीतील मुलांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे ही तर अत्यंत निषेधार्ह घटना आहे. त्याचा मी एक सर्जनशील कलाकार म्हणून निषेध करतो. 
"सध्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे काम सुरू आहे. त्याचा फटका लहान मुलांनाही बसत आहे. या घटनेचा सर्व कलाकारांनी निषेध करायला हवा,' असे मत लोक सांस्कृतिक मंच व विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे सुबोध मोरे यांनी व्यक्त केला. सरकारच्या धोरणांबाबत कोणीही बोलू नये, असे लोकांच्या मनावर बिंबवले जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होत आहे, असेही मोरे म्हणाले. 

दरम्यान, या प्रकरणी बिदर पोलिसांनी शुक्रवारी त्या शाळेच्या मुख्याध्यापिका फरिदा बेगम आणि अनुजा मिन्सा या महिलेस अटक केली आहे. अनुजा ही चौथीत शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्याच्या तोंडी पंतप्रधानांबाबतचे आक्षेपार्ह वाक्‍य होते, त्या मुलाची आई आहे. या नाटिकेविरोधात नीलेश रक्‍शाल नावाच्या कार्यकर्त्याने पोलिसांत तक्रार दिली होती. ही नाटिका "सीएए' कायद्याबाबत अपप्रचार करणारी असून, त्यात पंतप्रधानांचा अपमान करण्यात आला आहे, अशा आशयाची तक्रार त्याने नोंदविली होती. या प्रकरणी संपूर्ण शाळा आणि व्यवस्थापन मंडळाविरोधात दंडसंहितेचे कलम 124 (अ) आणि 153 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 124 (अ) हे देशद्रोहाबाबतचे ब्रिटिशकालीन कलम आहे. 
 

आज चौथीतल्या मुलांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला, उद्या त्यांच्या जागी आपण असू. या घटनेचा महाराष्ट्रातील प्रत्येक रंगकर्मीने व्यक्त होऊन प्रखर निषेध नोंदवला पाहिजे. 
- संतोष काणेकर, "झुंड' नाटकाचे निर्माते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com