

मुंबई : मुंबईत दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कच्या मैदानाचा मुद्दा गाजलेला असतानाच आता छटपूजेच्या निमित्तानेही घाटकोपरच्या मैदानाचा मुद्दा गाजणार आहे. घाटकोपरच्या आचार्य अत्रे मैदानाच्या निमित्ताने आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप आमने सामने आले आहेत. मैदानाच्या मुद्द्याचे प्रकरण आता कोर्टातही पोहचले आहे.
छटपूजेच्या सारख्या उत्तर भारतीय समाजाच्या सणाला राजकीय रंग देऊन बेरंग करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबई कार्याध्यक्ष राखी जाधव करत असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट बोलत होते. मुंबईत भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या छटपूजेच्या कार्यक्रमाला हायजॅक करण्याच्या प्रयत्नावर सडकून टीका केली.
मागील वर्षी कोविडच्या काळात अटल सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानला या मैदानावर छटपूजा करण्यासाठी परवानगी मिळणार होती. या संस्थेला तसेच उत्तर भारतीयांच्या सणासाठी भारतीय जनता पक्ष मदत करत असते. परंतु राखी जाधव यांनी मात्र कार्यक्रम हायजॅक करण्याचा प्रयत्न केला होता. जबरदस्तीने या कार्यक्रमात झुकून राखी जाधव यांनी कार्यक्रम हायजॅक केला. आताच्या वर्षीही गणपती, नवरात्रौत्सव विसर्जन तसेच छटपूजेसाठी पालिकेकडे जुलै महिन्यात राखी जाधव यांनी परवानगी मिळवली होती.
परंतु ही परवानगी देतानाच अटी व शर्थींसह ही परवानगी देण्यात आली होती. राखी जाधव यांनी परवानगी न घेता मैदान वापरल्याने परिमंडळ ६ चे उपायुक्त यांनी ही परवानगी रद्द केली. स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस यांचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच पालिकेला जमीनीसाठीचे भाडे न भरल्यानेच ही परवानगी रद्द केल्याचे पालिकेने म्हटले आहे. आता केवळ महापालिकेविरोधात आंदोलन करून तसेच संस्थेला कोर्टातून परवानगी मिळवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न राखी जाधव करत असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे.
छटपूजेसाठी सर्वाधिक आधी परवानगी आम्हाला मिळालेली असताना आता न्यायालयात आम्हाला दुसऱ्या मैदानात छटपूजा आयोजन करण्याचे पालिकेचे वकील सांगतात. सत्ताधारी पक्षाच्या बाजूने किती आपले निर्णय बदलायचे हे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या वागणुकीतून दिसून आले आहे. याच मैदानात कृत्रिम तलावात मोठ्या प्रमाणात मूर्ती विसर्जनासाठीची व्यवस्था करणारे पालिकेचेच अधिकारी होते.
मी परवानगीच्या मुद्द्यावर कोर्टात गेल्यानंतर पालिकेने मला परवानगी नाकारल्याची नोटीस पाठवली. त्यामुळेच पालिकेचा कारभार हा भाजप कार्यालयातून चालतो का ? असाही सवाल राखी जाधव यांनी केला आहे. येत्या २५ ऑक्टोबरला या प्रकरणातील पुढील सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या दारात मला नक्कीच न्याय मिळेल, असाही दावा त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.