मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुरु केली नवी प्रणाली 

मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुरु केली नवी प्रणाली 

मुंबई- मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांना आता पुराचा धोका सांगणारी यंत्रणा मिळणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईसाठी नवीन पूर चेतावणी यंत्रणा सुरू केली. या प्रणालीला 'Boon' (वरदान) असं संबोधलं आहे. मुसळधार पाऊस पडला की मुंबईची तुंबई होते आणि मग अनेक लोकं बरेच दिवस कुठेना कुठे अडकून पडतात. त्यात मुंबईचं जनजीवन विस्कळीत होऊन जातं. मात्र मुंबईकरांनो चिंता करु नका, कारण ही यंत्रणेमुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल कमी होतील हे निश्चित आहे. 

दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते आणि यामुळे आर्थिक राजधानीच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या लोकांना मोठा त्रास होतो. इंटीग्रेटेड फ्लड वॉर्निंग सिस्टम (INFLOWS) मुंबईसाठी विकसित करण्यात आली असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे देखील या उद्घाटनास उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, या प्रणालीचा मुंबईकरांना चांगला फायदा होईल. कारण यामुळे पुराचा अंदाज घेता येणार आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले की, ही केंद्र सरकारची मुंबईतल्या जनतेला भेट आहे. मला आशा आहे की जर राजकीय वादळासाठीही अशीच सतर्कता यंत्रणा महाराष्ट्रात मिळाली असती, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विनोद केला. 

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)च्या निकट सहकार्याने पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने इनफ्लॉज (INFLOWS) विकसित केली आहे. हर्षवर्धन यांनी नमूद केले की, हे पुरासाठी विशेषत: जास्त पाऊस आणि चक्रीवादळ दरम्यान लवकर चेतावणी देईल. केंद्रीय मंत्री म्हणाले की, INFLOWS ही एक अत्याधुनिक प्रणाली आहे. ज्यामुळे मुंबईतील लोकांना आधीच सावधगिरी बाळगण्याची संधी मिळेल. भारताने संपूर्ण जगासाठी त्वरित त्सुनामीची चेतावणी प्रणाली विकसित केली आहे आणि ही प्रणाली आपल्या देशात इतर देशांनाही मदत करेल, असे ते म्हणाले.

या यंत्रणेमुळे बाधित होणाऱ्या लोकांचं स्थलांतर करणं आणि त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवणं याबाबतचे निर्णय घेण्यासाठी प्रशासनाला मदत होईल. तसंच निर्णय घेण्यात देखील मदत होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीची सूचना आधीच मिळाली तर रेल्वे आणि पालिकेच्या यंत्रणाही सतर्क होतील. तसंच त्यामुळे लोकांनाही याबाबतच्या सूचना आधीच प्राप्त होतील. पावसाळ्यात बरेच नागरिक अडकून बसतात आणि तुंबलेल्या पाण्यातून आपल्या घराची वाट धरतात. या दरम्यान अनेक अपघात देखील होत असतात. याच पार्श्वभूमीवर या यंत्रणेमुळे ज्या ज्या ठिकाणी पाणी साचते त्या त्या ठिकाणी आधीपासून यंत्रणा सज्ज ठेवता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com