गुडघाभर साचलेल्या पाण्याने भिवंडीत वाहनचालक वैतागले

mumbai.jpg
mumbai.jpg
Updated on

वाडा : भिंवडी-वाडा-मनोर या मार्गावरील भिवंडी शहरातील नदीनाका व शेलार परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी दररोज असल्याने येथे नित्याचीच वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशी अक्षरशः हैराण झाले आहेत. त्यातच कमी उंचीच्या कारमध्ये पाणी जाऊन बिघाड होण्याच्या घटनांतही वाढ होऊन आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

पावसाळ्यात वर्षानुवर्ष हीच समस्या असल्याने प्रवासी व चालक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. मात्र प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. दरम्यान, ठाणे व कल्याण येथे जाण्यासाठी वाडा, विक्रमगड, जव्हार मोखाडा, डहाणू, तलासरी येथुन प्रवास करणाऱ्यांचे मात्र, या पाण्यामुळे अतोनात हाल होताना दिसत आहे. भिंवडी- वाडा- मनोर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सरकारने गेल्या पाच वर्षापूर्वी बांधा वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर सुप्रीम कंपनीला दिला आहे. या रस्त्याच्या कामाचा काळावधी 24 महिने होता. मात्र, पाच वर्षं उलटुनही रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.

वनविभागातील 16 किमी अंतराचा रस्ता अद्यापही दुपदरीच आहे. तसेच पिंजाळ व देहर्जे या नद्यावरील पुलांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. भिवंडी तालुक्यातील शेलार परिसरातील पाच ते सहा किमी अंतराचा रस्ताही दुपदरीच आहे. शेलार येथे रस्त्याची रूंदी न वाढविल्याने येथील रस्ता दुपदरीच आहे. शेलार ते नदीनाका परिसरात रस्त्याची उंची न वाढविल्याने येथे थोड्या पावसातही पाणी रस्त्यावर येते. नुसतेच पाणी रस्त्यावर येत नसुन गुडघाभर पाणी रस्त्यावर साचते. त्यामुळे वाहनचालकांना पाण्यातून रस्ता शोधावा लागतो.

पावसाळ्यात दररोज पाणी रस्त्यावर साचल्याने वाहनचालकांची त्रेधा त्रिरपिट उडते. उंचीने मोठी असलेल्या वाहनांना या पाण्यातून मार्ग काढताना विशेष नाही पण, उंचीने कमी असलेल्या कार गाड्यांना अक्षरशः कसरत करावी लागते. काही वेळा या पाण्यामुळे गाड्यात बिघाड होण्याचे प्रकार घडत असून त्यामुळे कार मालकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तासन् तास या पाण्यामुळे वाहतूकीचा खोळंबा होत असल्याने चालकांसह प्रवाशी हैराण झाले आहेत.

जास्त पुराच्या पाण्यात नोकरधंद्यानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना सक्तीने घरीच बसावे लागते तर, नदीनाका येथे जास्त पाणी असल्याने नागरिकांनी अंबाडी दाभाड भिवंडी असा वळसा देऊन जावे लागते. त्यामुळे वेळ व आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. या संदर्भात सुप्रीम कंपनीचे अधिकारी झेड एन शेख व सार्वजनिक बांधकाम विभाग भिवंडीचे सहाय्यक अभियंता पंकज धात्रज यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 
 

विश्वभारती बायपास रस्त्याचे काम रखडले 
भिवंडी वाडा या रस्त्यावरील शेलार येथे रस्त्यालगत घरे मोठ्या प्रमाणात आहेत. जर येथे चौपदरीकरण केले तर, अनेक घरे त्यात जाऊन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होते. त्यामुळे येथे रस्ता दुपदरीच ठेवून विश्वभारती मार्गे भिवंडी असा बायपास रस्ता करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर बायपास रस्त्याचेकाम सुरू करण्यात आले. एक दोन ठिकाणी पुले बांधण्यात आली. मात्र रस्त्याचे काम अद्यापपर्यत झालेले नसून तो अपूर्णच अवस्थेत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com