कोंडी फुटेना; वाट मिळेना; पालिका चिडीचूप 

कोंडी फुटेना; वाट मिळेना; पालिका चिडीचूप 
Updated on

वसई : वसई-विरार शहर महापालिकेने ना फेरीवाला धोरण निश्‍चित न केल्याने याची डोकेदुखी सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. नालासोपारा शहरात रोजच कोंडीचा सामना केल्याशिवाय पुढचा प्रवास करता येत नाही. फेरीवाल्यांचा उच्छाद आणि रस्त्याला लागूनच उभी असणारी वाहने असे चित्र सर्रास दिसत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत; मात्र महापालिका प्रशासन चिडीचूप आहे. 


नालासोपारा शहराची लोकसंख्या वाढत आहे. मुंबई, ठाणे, वसईसह अन्य भागांत कामानिमित्त जाणारे हजारो प्रवासी सकाळी घरातून बाहेर पडताच त्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. हीच परिस्थिती संध्याकाळीदेखील असते. आचोळे मार्ग, तुळिंज मार्ग, अलकापुरी, नालासोपारा पश्‍चिम उड्डाणपूल ते सर्कलपासून फुटपाथ, गटारे यासह रस्तेदेखील फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. त्यातच वाहनेदेखील उभी केली जात असल्याने रुंद रस्ते अरुंद झाले आहेत. याचा फटका अनेकदा अग्निशमन दल, रुग्णवाहिका अशा अत्यावश्‍यक सेवांना बसत आहे. नालासोपारा पूर्वेकडून वसई, विरार व पेल्हार महामार्ग आदी ठिकाणी जाण्यासाठी रस्ता आहे, परंतु उड्डाणपुलाखाली होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना नाकीनऊ येत असतात. पूर्वेलाच असणाऱ्या तुळिंज पोलिस ठाण्यालादेखील वाहनांचा विळखा कायम आहे. 

ही बातमी वाचा ः ठाण्यातील पार्किंग प्लाझामुळे रेल्वे कोट्याधिश 
फेरीवाल्यांचा विळखा 

एकीकडे नागरिकांसाठी सुसज्ज रस्ते उभारून पालिका सेवा देण्याचा प्रयत्न करत असली, तरी मात्र फळविक्रेते, भाजीपाला, मोबाईल साहित्य, भांडी, कपडे विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढत आहे. फेरीवाल्यांचे वाढते बस्तान व रस्त्याच्या कडेला वाहनांची होणारी गर्दी रोखण्यास महापालिका प्रशासनाला अपयश येत आहे. फेरीवाल्यांसाठी एकाच ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे, वाहनतळ नव्याने निर्माण करणे यासाठी वसई-विरार महापालिका धोरण निश्‍चित करणार होती, परंतु अद्यापही याबाबत कार्यवाही झाली नाही. त्यामुळे रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून जोर धरू लागली आहे. 


वाहतूक कोंडीसंदर्भात वसई-विरार शहर महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. टोईंग वाहने उपलब्ध झाल्यास रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे सोपे जाईल. फेरीवाल्यांबाबत महापालिकेने लक्ष घातले पाहिजे. 
- विलास सुपे, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग 


वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येते. त्यांना हटवून फूटपाथ, रस्ते मोकळे केले जातात. पुन्हा जर त्याच ठिकाणी फेरीवाले बसत असतील, तर तीव्रपणे मोहीम हाती घेतली जाईल, नालासोपारा शहरात रस्त्याच्या बाजूला असणारी वाहनेदेखील वारंवार उचलली जातात. 
- संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महापालिका. 


नालासोपारा पूर्वेला चालणेदेखील मुश्‍कील होत आहे. अनेक विक्रेते हे फूटपाथ व रस्त्याला लागूनच आपले सामान ठेवतात. याबाबत वसई-विरार महापालिकेने योग्य ती कारवाई केली पाहिजे; अन्यथा ही गर्दी वाढत राहील. 
- मयूर घुडे, नागरिक, नालासोपारा. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com