मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?, नियम पाळा नाहीतर तुरुंगाची हवा खा

मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?, नियम पाळा नाहीतर तुरुंगाची हवा खा

मुंबई: कोविडच्या वाढणाऱ्या रुग्णांबरोबरच आता मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आली आहे. लग्नसमारंभ, प्रार्थनास्थळे, पब, बार, क्लब, कार्यालयांमध्ये फक्त 50 जणांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार आहेत. तर एकाच इमारतीत पाच पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सिल करण्याचे आदेश गुरुवारी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले.

मुंबईसह राज्यातील काही जिल्हयात कोविडचे रुग्ण वाढू लागल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच परिस्थितीत न सुधारल्यास पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल असे संकेतही दिले होते. त्यानंतर काल आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियम मोडणाऱ्यांवर सक्ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. लग्नसमारंभासारख्या सोहळ्यांमध्ये मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न राखण्यासारखे प्रकार आढळत आहे. त्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे. रोज किमान सभागृहांना भेटी देऊन आढावा घ्यावा. नियम न पाळणाऱ्यांवर नागरिकांवर कारवाई कराच त्याचबरोबर लग्नाचे आयोजक, सभागृहाचे व्यवस्थापक यांच्यावर गुन्हे दाखल करावे असे आदेशच आयुक्तांनी दिले आहेत.

लग्न समारंभासह बार पब,उपहारगृह, सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे, कार्यालयांमध्ये मास्क वापरला जात नसेल आणि सामाजिक अंतर पाळले जात नाही. त्याच बरोबर 50 माणसांपेक्षा जास्त गर्दी असेल तर कारवाई करण्यात येणार आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे. कोविडचा फास सुटू लागल्यावर महानगर पालिकेने इमारती सिल करण्याबाबत शिथीलता आणली होती. मात्रआता एका इमारतीत पाच पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास ती इमारत सिल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

हेही वाचा- Mumbai Hotspots: मुंबईतील 'हे' चार विभाग पुन्हा हॉटस्पॉटच्या दिशेने
 
रुग्णांवरही गुन्हे दाखल होणार

लक्षणं नसलेल्या रुग्णांना स्वत:च्या घरातच विलगीकरणात राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तसे शिक्के त्यांच्या हातावर मारण्यात येतील. त्यांना पालिकेच्या वॉर रुम मधून दिवसातून पाच ते सहा वेळा संपर्क केले जाणार आहे, असे रुग्ण जर त्यांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी घरा बाहेर पडल्यास संबंधित सोसायटीने पालिकेच्या वॉर रुमला कळवावे अशा सुचना करण्यात येणार आहे. विलगीकरणाच्या कालावधीत घराबाहेर पडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. साथ नियंत्रण कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. यात काही महिन्यांची कैद आणि दंडाची तरतूद आहे.

प्रत्येक रुग्णामागे 15 जणांचे विलगीकरण

ज्या नव्या भागांमध्ये कोविडचे रुग्ण वाढलेले दिसत आहे. तेथे मॅपिंग सुरु करुन चाचण्याची संख्या वाढावावी. तसेच अशा परिसरात प्रती रुग्णामागे किमान 15 जणांचे विलगीकरण करण्यात यावे. त्याच बरोबर झोपडपट्ट्या,वस्त्यांमध्ये बिगरशासकीय संस्थांच्या मदतीने आरोग्य शिबीर घेण्यात यावे, असेही आयुक्तांनी सांगितले.

कोविडच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन होणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने सर्व अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची खैर केली जाणार नाही. त्याच वेळी रुग्णालय, कोविड केंद्र यावरही लक्ष ठेवण्यात येत आहे.
इक्बाल सिंह चहल,आयुक्त मुंबई महानगर पालिका
 
कोविड केंद्रांचा आढावा घ्या

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आयुक्त चहल यांनी कोविड केंद्र, रुग्णालयांचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. जंम्बो कोविड केंद्रातील ऑक्सिजन पुरवठा, रुग्णशैया याचा नियमित आढावा घ्यावा. तसेच रुग्णालयांची माहिती तर तासांनी कंट्रोल रुमला कळावावी. प्रत्येक विभागात संशयित रुग्णांसाठी किमान 1 आणि लक्षणे नसलेल्यांसाठी किमाना 1 कोविड केंद्र सुरु ठेवावे असेही आयुक्तांनी नमुद केले.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona Virus Mumbai verge lockdown again Only 50 people attended the wedding

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com