मुंबई : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यामधील आठही जिल्ह्यांत निर्माण झालेली गंभीर परिस्थिती पाहता राज्य सरकारने येथे ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता तातडीने मदत देण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली. या परिस्थितीत कृषीमंत्री निवडणुकीत व्यस्त आहेत हे दुर्दैवी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
अतिवृष्टीमुळे लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोली या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मराठवाडयातील ज्या भागांमधील शेतकरी अडचणीत आले आहेत तेथे पंचनामे न करता त्यांना तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे. या भागात नाले दुथडी भरुन वाहत आहेत, तर शेतीपीक पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत तेथील पंचनामे करण्यासाठी व तेथील परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून किमान आठ दिवसांचा कालावधी लागेल. तोपर्यंत येथील शेतकरी व जनतेचे खूप हाल होतील. त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या या भागात ओला दुष्काळ जाहीर झाला तर या भागातील शेतक-यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकेल असेही दरेकर यांनी सांगितले.
राज्याचे पुनर्वसनमंत्री, कृषीमंत्री यांनी अतिवृष्टी झालेल्या भागांमध्ये तातडीने आढावा घेणे आवश्यक आहे. विभागीय आयुक्त कार्यालयानेही परिस्थितीतचा आढावा घेणे गरजेचे आहे. पण हे मंत्रीमहोदय सध्या निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे समजते. कृषीमंत्री दादा भुसे पालघरच्या निवडणुकीत व्यस्त आहेत, ही बाब दुर्दैवी आहे. राज्यकर्त्यांनी प्रथम संकटात सापडलेल्या जनतेची काळजी घेतली पाहिजे. जनता आहे म्हणून निवडणुका आहेत आणि म्हणून सरकार आहे, याचे भान सरकारला असले पाहिजे, असा टोलाही दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.