"दोन दिवसांचा लॉकडाउन असल्याने मी सहमती दिली, पण..."

Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray-Together
Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray-Together

मुंबई: सध्या राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. लसीकरण मोहिमेला प्राधान्य देण्यात आलं आहेच. पण राज्यात कोरोना रोखण्यासाठी मिनी लॉकडाउन आणि वीकेंड लॉकडाउनही लागू करण्यात आला आहे. हा निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली होती. प्रत्यक्षात मात्र काही वेगळीच परिस्थिती दिसत असल्याची जनतेची भावना आहे. या मुद्द्यावर भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर विधानसेभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या काही सूचनांचे पत्र आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले.

कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे छोटे व्यवसायिक आणि जनमानसात तीव्र नाराजी आहे. या सर्व घटकांशी पुन्हा नव्याने चर्चा करून अधिसूचना जारी करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवून केली. 'राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतोय आणि त्यामुळे कठोर निर्बंध लावावे लागतील, असा आपला दूरध्वनी मला आला होता. दोन दिवसांचा लॉकडाऊनचा विषय असल्याने आम्ही सहमती दर्शविली. मात्र, ज्याप्रकारे इतरही पाच दिवस लॉकडाऊनसदृश निर्बंध घालण्यात आली आहे, त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे', असं स्पष्ट फडणवीस यांनी पत्रातून व्यक्त केलं.

'काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून या लॉकडाउनचा विरोध करताहेत. हे निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार अजिबात करण्यात आलेला नाही. अनेक क्षेत्रांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसत असून अर्थव्यवस्थेलाही त्यामुळे मोठा फटका बसत आहे. ज्या प्रकारचे निर्बंध प्रत्यक्षात लादण्यात आलेत, ते पाहता हा एकप्रकारे अघोषित महिनाभराचा लॉकडाऊनच आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक आहे. अनेक बाबतीत संलग्नता पाहण्यात आलेली नाही. उदाहरणच द्यायचे झाले, तर वाहतूक (ट्रान्सपोर्टेशन) खुली ठेवताना गॅरेज आणि स्पेअरपार्टस दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. असेच प्रकार अनेक बाबतीत झाले आहेत', असं त्यांनी नमूद केलं.

"सध्याची परिस्थिती पाहता पुन्हा एकदा सर्व छोट्या-छोट्या घटकांशी चर्चा करून त्यांना दिलासा देण्यात यावा. सर्वांना विश्वासात घेऊन, गरिबांचे जीवन आणि अर्थकारण दोन्हीही प्रभावित होणार नाही, अशा पद्धतीने नव्याने निर्बंधांबाबतची अधिसूचना जारी करण्यात यावी. कोरोनाला रोखणे महत्त्वाचे आहेच. पण, कोरोना रोखताना अन्य मानवनिर्मित कारणांमुळे नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशीही कृती होता कामा नये. आपण तत्काळ यासंदर्भात पाऊले उचलावी", अशी सूचनावजा विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com