
मुंबई : शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी दूरस्थ शिक्षणाची आज अधिक आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केले. तसेच, विद्यापीठाने आपल्या दूरस्थ व मुक्त शिक्षणाची गुणवत्ता वृद्धिंगत केल्यास ‘आयडॉल’मधून एकलव्याप्रमाणे अनेक निष्णात विद्यार्थी घडतील, असेही ते म्हणाले. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त फिरोजशाह मेहता भवन विद्यानगरी मुंबई येथे गुरुवारी (ता. २४) आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. या वेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, आयडॉलचे संचालक प्रकाश महानवर, उपसंचालक मधुरा कुलकर्णी, निमंत्रक मंदार भानुशे, विभागप्रमुख व विद्यापीठाच्या प्राधिकार मंडळांचे सदस्य उपस्थित होते.
पत्रव्यवहार अभ्यासक्रमापासून तर आजच्या दूरस्थ व मुक्त शिक्षण पद्धतीपर्यंत अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत विलक्षण मोठे बदल झाले आहेत. कोविड संसर्गाच्या काळात ऑनलाईन शिक्षणामुळे महाविद्यालयांपासून दूर राहूनदेखील शिक्षण सुरू ठेवता येते, असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला, असे राज्यपालांनी सांगितले. कोविड संसर्ग कमी झाल्यामुळे आगामी काळात ऑनलाईन व ऑफलाईन अशा संमिश्र शिक्षणाला महत्त्व असेल, असे सांगताना अध्यापनात नावीन्य व तंत्रज्ञान यांची भूमिका महत्त्वाची असेल, असे कुलगुरू सुहास पेडणेकर म्हणाले. ‘आयडॉल’च्या माध्यमातून १३ नवे अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रस्तावित असल्याचे प्र-कुलगुरु रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. दूरस्थ व मुक्त शिक्षण विभागाची सुरुवात १९७१ साली ८४५ विद्यार्थ्यांपासून होऊन आज ८० हजार विद्यार्थी त्या माध्यमातून शिक्षण घेत असल्याचे आयडॉलचे संचालक प्रकाश महानवर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.