
वाढत्या मुंबईसाठी सरकारतर्फे विविध गृहनिर्माण योजना राबवण्यात येत आहेत. त्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट, परवडणाऱ्या घरांची निर्मिती, एसआरए व एमएमआरडीए यांच्या संयुक्त भागीदारीतून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, म्हाडा, सिडको व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजना इत्यादींच्या माध्यमातून नजीकच्या काळात सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याबाबत उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केलेली बातचीत.....
मुंबईसह एमएमआर क्षेत्रात घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घर या विषयाला सर्वोच्च स्थान आहे. आपले स्वतःचे हक्काचे छोटे का होईना; घर असावे म्हणून आपण आपली सगळी उपजीविका पणाला लावतो. आपले घर करताना साहजिकच सर्व प्रकारच्या सुविधा जवळपास उपलब्ध आहेत का, याचाही आपण प्रामुख्याने विचार करत असतो. गेल्या जवळपास तीन दशकांपासून मुंबई आणि महानगरामध्ये राज्याच्या अन् देशाच्या इतर भागांतून मोठ्या प्रमाणावर लोक येऊ लागले आहेत. हा ओघ अगदी पूर्वीपासूनच होता; पण जसजसे नागरीकरण वाढले आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ लागल्या, तसतसे मुंबईकडे लोक आकर्षित होऊ लागले. गेल्या दहा-बारा वर्षात पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ आणि त्यामुळे जीवनमानात सुधारणा हेदेखील लोकांची मुंबईला पहिली पसंती असण्यामागचे कारण आहे. अगदी १९९५ मध्ये शिवसेना-भाजप सरकार असताना मुंबईत सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात घर असावे, हा विषय प्राधान्याने घेतला गेला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे देण्याची योजनादेखील सुरू झाली. शिवशाही पुनर्वसन प्रकल्पदेखील उभारण्यात आला, हे सगळ्यांना ठाऊक आहे.