
अन्न कचऱ्यावरील विजेमुळे वाहनांना ‘ऊर्जा’ - आदित्य ठाकरे
मुंबई : मुंबई महापालिकेने पर्यावरणपूरक अशा वेस्ट फूड म्हणजेच अन्न कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशनची जोड दिली आहे. महापालिकेच्या ‘डी’ विभागातील (हाजी अली परिसर)केशवराव खाड्ये मार्गावर चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून अशा स्वरूपाचे भारतातील ते पहिलेच आहे. परिणामी अन्न कचऱ्यापासून निर्मित विजेवर वाहनांना ‘ऊर्जा’ मिळणार असून पर्यावरणालाही हातभार लागणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी (ता. ९) त्याचे लोकार्पण करण्यात आले.
मुंबईतील पर्यावरण संवर्धनासाठी आणि ‘स्वच्छ-सुंदर मुंबई’साठी मुंबई महापालिकेने आज आणखी एका अभिनव उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. फूड वेस्टमधून निर्मित विजेचा उपयोग करून इलेक्ट्रिक वाहन चार्ज करणारे भारतातील पहिलेच केंद्र उभारण्यात पालिकेला यश आले आहे. अशा स्वरूपाचे केंद्र मुंबईतच नव्हे तर राज्यातील शक्य त्या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विशेषतः महामार्गांवर त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. त्यातून विद्युत वाहनांच्या वापराला चालना तर मिळेलच, सोबत सेंद्रिय आणि जैविक स्वरूपाच्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापनही होईल.
पर्यावरणाला हातभार लावण्याचा प्रयत्न
पर्यावरणपूरक विद्युत वाहनांच्या वापराला प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी वेस्ट फूडमधून निर्मित विजेवर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहेत. केवळ मुंबईतच नाही तर राज्यभरात अशा प्रकारची स्टेशन्स उभारून पर्यावरणाला हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे कचऱ्याची समस्या सुटण्यासही मदत मिळणार असून पर्यावरणासाठी जे करता येईल ते करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
Web Title: Energy Vehicles Due Electricity On Waste Food Aditya Thackeray Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..