मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, सीताराम येचुरी आणि डी राजा हे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाचे नेते रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. येत्या ९ तारखेला संध्याकाळी पाच वाजता ही बैठक निश्चित झाल्याची माहिती आहे. सध्या समोर येणाऱ्या नावांमध्ये केवळ तीन नावे जरी समोर येत असली तरीही या मध्ये शिवसेना किंवा इतर पक्षाचे नेते देखील सहभागी होऊ शकतात अशीही शक्यता आहे. शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना आपलं निवेदन सादर करणार आहेत.
महत्त्वाची बातमी : जेंव्हा शरद पवार सकाळी सकाळीच जातात संजय राऊतांच्या घर
दरम्यान, आज शरद पवारांनी शेतकरी प्रश्नावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि शरद पवारांनी केंद्राने शहाणपणाची भूमिका घ्यावी असं मोठं वक्तव्य केलं आहे.
शरद पवार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणालेत, "सर्वात जास्त शेती आणि देशातील नागरिकांना होणाऱ्या अन्नपुरवठ्याबाबत विचार केला तर सर्वात जास्त योगदान पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचं आहे. गहू आणि तांदूळ उत्पादनात हे राज्य देशाची तर गरज भागवतातच, यासोबत आणखीन १७ ते १८ देशांना पुरवायचं काम हा देश करतोय ज्यामध्ये पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे पंजाब आणि हरियाणाच्या शेतकरी जेंव्हा रस्त्यावर उतरतो तेंव्हा त्याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यायला हवी."
पुढे बोलताना शरद पवार म्हणालेत, "मात्र, केंद्राने गांभीर्याने दखल घेतलेली असं दिसत नाही. असंच जर राहिलं तर हे आंदोलन केवळ दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही आणि देशातील कानाकोपऱ्यातील लोकं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील. त्यामुळे अजूनही शहाणपणाची भूमिका घेतली पाहिजे", असं शरद पवार म्हणालेत.
ex agriculture minister sharad pawars reaction on farmers protest in india
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.