
पालघर जिल्ह्यात वातावरण शांत
वसई : भोंग्यावरून महाराष्ट्रात वातावरण तापले असतानाच पालघर जिल्ह्यात मात्र बुधवारी (4) सकाळपासून शांततेचे वातावरण होते पोलिस कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता नागरिकांना गेले काही दिवस आवाहन करत आहेत.त्याला चांगला प्रतिसाद जिल्ह्यातून मिळत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आहे, तर मुस्लिम बांधवानी भोंगे न लावता मस्जिदमध्ये अजाण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मंगळवारी पालघर ग्रामीण मध्ये असणाऱ्या मस्जिदचे धर्मगुरू, समाजातील प्रमुखांची भेट पोलिसांनी घेत चर्चा केली सकाळी सहा पर्यंत भोंगे लावू नये कायद्याचे पालन करा असे आवाहन केले व त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षक कार्यलयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. बुधवारी सकाळी पालघर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे हे पाहणी करण्यासाठी बाहेर पडले होते.ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनसेच्या प्रमुखांना देखील पोलिसांनी सूचना दिल्या. वसई विरार मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाने 100 जणांना नोटिसा बजावल्या होत्या.
त्यातच मनसे पदाधिकाऱ्यांना देखील समज मंगळवारी रात्री उशिरा दिली. मस्जिद बाहेर विनापरवाना महाआरती दरम्यान आपणांकडून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जर अप्रिय घटना घडली तर कलमी 149 प्रमाणे नोटिसीचा भंग केला म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा आशयाच्या नोटिसा देण्यात आल्या. बुधवारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आयुक्त सदानंद दाते यांनी खबरदारी घेण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्याला दिल्या असून पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.पहाटे ४ वाजता सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आयुक्त सदानंद दाते , अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर हे स्वता बाहेर पडून परिस्थितीचा आढावा घेत होते. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुजाण नागरिकांशी चर्चा करून शांततेचे आवाहन केले त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार दुपारी 12 पर्यंत घडला नाही अशी माहिती पोलीस आयुक्तालयाचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बोईसर , पालघर , डहाणू, कासा , तलासरी , विक्रमगड , जव्हार , मोखाडा, बोर्डीसह वसई , विरार ,नालासोपारा , मीरारोड , भाईंदरमध्ये सकाळपासून शांततेचे वातावरण पाहावयास मिळाले. पोलिसांनी तीन दिवस ठिकठिकाणी रूट मार्च काढला व नागरिकांनी सहकार्याची भावना दाखवली असल्याने पालघर जिल्ह्यात असामाजिक घटना घडल्या नाहीत.
4 मंदिरात हनुमान चालीसा पठण
मनसेकडून (ता.4 ) ,नवघर, मीरा रोड , नयानगर व आचोळे येथे सायंकाळी चार ठिकाणी हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली त्यामुळे यावेळी पोलीस तैनात असणार आहेत. तर काशीमीरा येथील 2 ठिकाणी मंदिरात हनुमान चालीसा पठण करण्यात येणार होती मात्र हे आयोजन रद्द करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या हद्दीत विना स्पीकर मुस्लिम बांधवानी अजाण केली आहे कुठेही कायद्याचे उल्लंघन केले नाही नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
विजयकांत सागर - पोलीस उपायुक्त.
Web Title: Hanuman Chalisa Played Palghar District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..