Vidhan Sabha 2019 : युती फिस्कटली तर 'ठाणे' कोणाचे?

ShivSena-BJP
ShivSena-BJP

विधानसभा 2019 : ठाणे जिल्ह्यात भाजप-शिवसेना युती टिकून राहिली तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची मोठ्या प्रमाणात दमछाक होईल. युती फिसकटली तर कळवा-मुंब्रा मतदारसंघाचा अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी शिवसेना- भाजपमध्ये चुरशीची लढत होईल. मोदी लाटेतही जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले होते, हे विसरता येणार नाही.

शिवसेनेकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे; तर भाजपकडे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण असे जिल्हास्तरावरील नेतृत्व कार्यरत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्हास्तरावरील नेतृत्वाची वानवा आहे. तशात भाजपकडे गेलेल्या गयारामांमुळे या पक्षांची अवस्था अधिकच गलितगात्र झालेली आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप नाईक भाजपमध्ये गेले आहेत. पांडुरंग बरोरा यांनी धनुष्यबाण हाती घेतला आहे. उल्हासनगर येथील 'राष्ट्रवादी'च्या आमदार ज्योती कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांचे भाजपबरोबरचे सख्य वाढलेले आहे.

अशावेळी कळवा मुंब्रा येथील 'राष्ट्रवादी'चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघाचा अपवाद वगळता आघाडीची अनेक मतदारसंघात उमेदवार निवडतानाही दमछाक होणार असल्याचे स्पष्ट आहे. नाईक यांच्या प्रवेशाने एकेकाळचे भाजप-शिवसेना महायुतीचे प्रमुख विरोधकच संपल्यामुळे नवी मुंबईत भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय निश्चिशत मानला जात आहे. मनसेने या निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फटका प्रामुख्याने युतीच्या मतांना बसणार असल्याचे मानले जात आहे. युती झाली नाही आणि मनसे स्वतंत्रपणे रिंगणात उतरली, तर ठाणे जिल्ह्यातील चित्र पूर्णपणे पालटेल. आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास त्यामुळे मदत होईल, हीच त्यांच्यासाठी एक दिलासादायक बाब.

पालघरमध्ये आघाडीचे ठरले
पालघर जिल्ह्यात शिवसेनेने परस्परच वसईतील तीन जागांसह पालघरवर दावा सांगितला आहे. लोकसभेला भाजपने आपल्या हक्काच्या मतदारसंघावर पाणी सोडून शिवसेनेचा हट्ट पुरविला होता, त्याचाच दुसरा अंक आता विधानसभेसाठीही दिसू लागला आहे. युतीत एकवाक्यटता होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर आघाडीचे मात्र ठरल्याचे बोलले जात आहे. डहाणू मतदारसंघ मार्क्सवादी कम्युनिस्ट, विक्रमगड राष्ट्रवादी काँग्रेस, पालघर काँग्रेस आणि वसई, नालासोपारा आणि बोईसरसाठी बहुजन विकास आघाडी यावर एकमत झाले असल्याने आघाडीने आपल्या प्रचाराला सुरवात केली आहे.

'बहुजन विकास'पुढे मात्र अनेक अडथळे आहेत. बोईसरचे आमदार विलास तरे यांनी केलेले पक्षांतर आणि शिवसेनेने उभे केलेले आव्हान, यातून त्यांना मार्ग काढावा लागणार आहे. नालासोपाऱ्यातून शिवसेनेने 'चकमक'फेम प्रदीप शर्मा यांना उभे करून या आघाडीसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com