अधिवेशनात याविषयी आमदार पाटील यांनी लक्षवेधी मांडत सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले होते.
डोंबिवली : पाणी टंचाईची (Water Shortage) समस्या अनेक भागात निर्माण झाली आहे. रिजन्सी अनंतम येथे गेले अनेक दिवस पाणी येत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी रविवारी येथील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर सोमवारी रहिवाशांसह आमदार पाटील यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट घेतली.
उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. पाणी कपात केल्यामुळे अनेक भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. असे असताना नवी बांधकामे मात्र शहरात जोरात सुरू असून त्यांना दिले जाणारे पाणी बंद करून नागरिकांना प्यायला पाणी द्या, अशी मागणी आमदार पाटील यांनी एमआयडीसी (MIDC) अधिकाऱ्यांकडे केली.
पावसाळा लांबण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने ऑगस्ट पर्यत पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना नगरविकास विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार एमआयडीसी कडून 15 दिवसांतून एकदा पाणी कपात केली आहे. यामुळे अनेक भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. रिजन्सी अनंतम हे बडे गृहसंकुल असून याठिकाणी नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून घर घेतले आहे.
सध्याच्या घडीला येथील रहिवाशांना एक तास देखील पाणी येत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कल्याण ग्रामीणचे आमदार पाटील यांच्याकडे रहिवाशांनी समस्या मांडल्याने पाटील यांनी येथील रहिवाशांची रविवारी भेट घेतली. त्यानंतर सोमवारी आमदार पाटील यांनी रहिवाशांसह एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता सी. पी. आव्हाड यांची भेट घेतली.
यावेळी डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, संदीप पाटील, रहिवाशी रफीया कुलकर्णी, दिशा करिया, लता अरगडे यांसह अनेक रहिवासी उपस्थित होते. याविषयी आमदार पाटील म्हणाले, केडीएमसीतील 27 गावात पाणी टंचाई आहे. अमृत योजनेचे काम संथ गतीने सुरु आहे. मंजूर पाण्याचा कोटा मिळत नाही. पाण्याचा कोटा वाढविल्याशिवाय पाणी समस्या सुटणार नाही. तात्पुरता दिलासा देण्यासाठी काय करता येईल यासंदर्भात अधिकाऱ्यांची भेट घेतली.
अधिकाऱ्यांनी काही उपाययोजना सांगितल्या असून त्यानुसार पाहणी ते करणार आहेत. अमृत योजनेचा 105 एमएलडीचा कोटा द्या. केडीएमसीचे 140 दश लक्ष लीटरचे पाणी कोटा नवी मुंबईला जातो. तो परत द्या. अधिवेशनात याविषयी आमदार पाटील यांनी लक्षवेधी मांडत सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन ही दिले होते. तो कोटा अद्याप आम्हाला मिळालेला नाही.
त्या कोट्यासाठी भांडलो तर या ठिकाणचा पाणी प्रश्न सूटेल ते आम्ही करू. पाणी टंचाई असताना देखील नवी बांधकामे शहरात सुरू असून त्यांना पाणी दिले जात आहे. या बांधकामांचे पाणी बंद करून ते नागरिकांना प्यायला द्यावे अशी मागणी यावेळी आमदार पाटील यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना केल्याचे सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.