कशेडी घाटातील बोगदा बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे.
कशेडी घाटातील बोगदा बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे.

कोकणवासीयांसाठी खूशखबर! कशेडी घाटातील बोगद्याचे काम वेगात

पोलादपूर : नैसर्गिकदृष्ट्या धोकादायक, सातत्याने होणारे अपघात, अवजड व रसायनवाहू वाहनांची डोकेदुखी, यामुळे खडतर झालेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील प्रवास आता सुसाट होणार आहे. या घाटात आता बोगदा बांधण्याचे काम वेगाने सुरू असून रायगड हद्दीतील कामही सुरू झाले आहे. खेड हद्दीतील सुमारे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. या बोगद्यामुळे वाहनचालकांना वळणा-वळणाच्या घाटातून गाडी नेण्याचीही कसरत करावी लागणार नाही. शिवाय 40 मिनिटांच्या या प्रवासाचे हेच अंतर केवळ 9 मिनिटांत कापता येणार आहे. 

कशेडी बोगदा हा चौपदरीकरणातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. रत्नागिरीचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते 26 जानेवारीला 2019 मध्ये कामाचा शुभारंभ रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हद्दीत करण्यात आला. मुंबई-गोवा महामार्गाच्या इंदापूर ते कशेडी या दुसऱ्या टप्प्यातील चौपदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. याच मार्गावर पोलादपूर ते खवटी असा कशेडी घाट आहे. रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हा घाट महत्त्वाचा; पण तितकाच धोकादायक मानला जातो. तो पार करण्यासाठी वाहनांना 40 मिनिटांचा कालावधी लागतो.

या घाटातून प्रवास करताना वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात; तर रसायनवाहू वाहने घाटात कलंडल्याने वाहतूक कोंडी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यटकांबरोबरच गणेशोत्सव व शिमगोत्सवात येथे मोठी वाहतूक कोंडी होत असते. 

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या बोगद्यासाठी सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर बोगद्याचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर्स कंपनीला देण्यात आले आहे. या कामासाठी रुपये 502.25 कोटी खर्च येणार असून पावणेदोन किलोमीटरचे एकदिशा मार्गाच्या वाहतुकीसाठी दोन बोगदे तयार करण्यात येणार आहेत.

महत्‍वाची बातमी : एमआरआयडीसी बांधणार १० पूल

बोगद्यामध्ये जाण्यासाठी तीन व येण्यासाठी तीन अशा एकूण सहा मार्गिका असतील. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर त्या रस्त्याच्या डागडुजीची जबाबदारी चार वर्षे ठेकेदारावरच राहणार आहे. 

बोगद्यात आपत्कालीन व्यवस्था 
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका हद्दीत भोगाव गावाजवळ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्‍याच्या कशेडी हद्दीत बोगद्यांचे काम वेगात सुरू आहे. कशेडी घाटातील दोन्ही बोगद्यांचे काम सुरू असून आतापर्यंत अंदाजे 400 मीटरपर्यंतचे काम झाले आहे. येथे आपत्कालीन व्यवस्था असणार आहे. चोळई गावापासून धामणदेवी गावापर्यंत सहा किलोमीटर अंतरात मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चौपदरीकरणाच्या कामासाठी दरी व डोंगराच्या बाजूला ठेकेदार कंपनीमार्फत रस्ता तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. 

डोंगर पोखरण्याचे काम सुरू 
मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर ते खवटी गाव असे चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हा घाटमार्ग महत्त्वाचा मानला जातो. चोळई गाव हद्दीत सुरू होणारा घाटमार्ग नागमोडी, अवघड वळणाचा, तीव्र चढ-उताराचा आणि एका बाजूला खोल दरी व दुसऱ्या बाजूला डोंगर असा 40 किलोमीटर अंतराचा आहे. सद्यस्थितीत बोगद्याचे काम रायगड हद्दीत सुरू झाले असून कामतवाडी येथील डोंगर पोखरण्यात येत आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर डम्परसह अत्याधुनिक यंत्रसामग्री आणल्याने येत्या वर्षभरात काम पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई-गोवा महामार्गाच्या कशेडी घाटातील प्रवासाचे अंतर भुयारी मार्गामुळे 4.5 किलोमीटरने कमी होण्याची शक्‍यता आहे. कशेडी घाटातून धोकादायक वळणावरून गाडी चालवताना निर्माण होणारा धोका यापुढे टळणार आहे 
- प्रकाश गायकवाड, कार्यकारी अभियंता, राष्‍ट्रीय महामार्ग विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com